Photo | Ind Vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, चेन्नईचं मैदान कोण मारणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 2021) यांच्यात आजपासून (5 फेब्रुवारी) कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम (M A Chidambaram) स्टेडियममध्ये होत आहे.

या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच टीम इंडिया भारतात खेळणार आहे. इंग्लंड आणि टीम इंडियाने गत कसोटी मालिकेत यजमान संघाचा त्यांच्याच भूमित पराभव केला आहे. या उभय संघाचा विश्वास वाढलेला आहे. यामुळे दोन्ही संघांमध्ये या कसोटी मालिकेसाठी उत्साहाचं वातावरण आहे.

टीम इंडिया मायदेशात खेळणार आहे. यामुळे टीम इंडियासाठी हा प्लस पॉइंट आहे. त्यात नियमित कर्णधार विराट कोहली, दुखापतग्रस्त गोलंदाज इशांत शर्मा आणि ओपनर के एल राहुल यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. हार्दिक पंड्यानेही कमबॅक केलं आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी द्यायची, असा प्रश्न कर्णधार कोहली आणि टीम मॅनेजमेंट समोर आहे.

टीम इंडियाचे सर्वच खेळाडू हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून चांगल्या फॉर्मात आहेत. त्यात अनुभवी विराट आणि इशांतचे पुनरागमन झाले आहे. यामुळे बॅटिंग आणि बोलिंग साईड आणखी मजबूत झाली आहे. त्यामुळे इंग्लंडसमोर टीम इंडियाचे तगडे आव्हान असणार आहे.

इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांचंही कमबॅक झालं आहे. स्टोक्स बॅटिंग आणि बोलिंग अशा दोन्ही आघांड्यावर दमदार कामगिरी करतो. तो आयपीएलमध्ये भारतात खेळला आहे. यामुळे त्याला इथल्या खेळपट्ट्यांची जाण आहे. यामुळे स्टोक्सला रोखण्याचे आवाहन भारतीय गोलंदाजांसमोर असणार आहे. तसेच आर्चर हा इंग्लंडच्या मुख्य गोलंदाजांपैकी एक आहे. यामुळे आर्चरपासून सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे.

जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट बोर्ड हे इंग्लंडचे महत्वाचे गोलंदाज आहेत. या दोघांनी मिळून कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 1100 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. अँडरसनचा हा 5 वा भारत दौरा आहे. यामुळे या दोन्ही गोलंदाजांविरुद्ध खेळण्यासाठी रणनिती आखून खेळणं गरजेचं असणार आहे.

सामन्याच्या दिवशी सकाळी खेळपट्टी कशी असेल हे पाहणे मजेदार ठरणार आहे. ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल ठरेल असं म्हटलं जात आहे. यामुळे या सामन्यात दोन्ही संघापैकी कोणत्या संघाचे फिरकी गोलंदाज यशस्वी ठरणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.