74 तास सलग धावणारी भारतातील अनोखी ट्रेन, देशाच्या या दोन टोकांना जोडते
Indian Railways : भारतीय रेल्वे नेटवर्कची चर्चा संपूर्ण जगभरात होते. कारण जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क भारतात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. आज आपण 74 तास सलग धावणाऱ्या ट्रेनची माहिती जाणून घेऊयात.

ट्रेनचा प्रवास : आजही भारतात सर्वाधिक लोक ट्रेनने प्रवास करणे पसंत करतात. जरी काळ बदलला असला, तरी रेल्वेचे महत्त्व कमी झालेले नाही. वेळ वाचवण्यासाठी अनेकजण विमानप्रवास करतात, तर काहीजण बस, कॅब, टॅक्सी किंवा स्वतःच्या वाहनांचा वापर करतात.

हजारो एक्सप्रेस : भारतात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. अहवालानुसार, देशात रोज सुमारे 11,740 गाड्या धावतात. यामध्ये एक्सप्रेस, सुपरफास्ट, दुरांतो, इंटरसिटी, राजधानी आणि वंदे भारतसारख्या गाड्यांचा समावेश आहे.

72 तास धावणारी ट्रेन : देशात अशाही काही गाड्या आहेत ज्या उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम भारताला जोडतात. काही ट्रेन तर सलग तीन दिवस म्हणजेच 72 ते 74 तास सतत धावतात.

अरोनाई एक्सप्रेस : ही ट्रेन सलग 74 तास प्रवास करून दक्षिण भारताला ईशान्य राज्यांशी जोडते. ही ट्रेन तिरुवनंतपुरम सेंट्रलपासून आसाममधील सिलचरपर्यंत धावते. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन म्हणून तिची ओळख आहे.

57 स्थानकांवर थांबा : या प्रवासादरम्यान ही ट्रेन तब्बल 3,917 किलोमीटर अंतर पार करते. विशेष म्हणजे, ही ट्रेन 57 रेल्वे स्थानकांवर थांबते. तसेच जगातील सर्वात लांब ट्रेन सेवांमध्ये तिचा 28वा क्रमांक लागतो.