
इराणमधील तणाव आणि समुद्रातील महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवर येणाऱ्या अडथळ्यांमुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. यामुळे तेल पुरवठ्याबाबत भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष भारताच्या स्वतःच्या तेल उत्पादनाकडे वळले आहे.

पण भारतात सर्वात जास्त तेल विहिरी नेमक्या कुठे आहेत? आणि जमिनीतून निघणाऱ्या या तेलाचा खरा मालक कोण असतो? असा प्रश्न आपल्याला कायमच पडलेला असतो. आज आपण याचे उत्तरे जाणून घेऊया.

ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिल्यास आसाम हे भारतातील सर्वात जुने आणि प्रमुख तेल उत्पादक राज्य आहे. १८८९ मध्ये देशातील पहिली तेल विहीर आसाममधील दिगबोई येथे खोदण्यात आली होती.

त्यानंतर नाहरकटिया आणि मोरान-हुगरिजान सारखी मोठी तेल क्षेत्रे विकसित झाली, ज्यामुळे आसाम भारतीय पेट्रोलियम उद्योगाचे मुख्य केंद्र बनले. सध्याच्या घडीला राजस्थान हे भूप्रदेशावरील (Onshore) तेल उत्पादनात देशात आघाडीवर आहे. थर वाळवंटातील बारमेर खोरे हे भारतातील सर्वात सुपीक तेल उत्पादक क्षेत्र म्हणून उदयास आले आहे.

विशेष म्हणजे, येथे सुमारे २०० नवीन विहिरी खोदण्याची योजना असून, यामुळे राजस्थानचे स्थान आणखी भक्कम होणार आहे. आसाम आणि राजस्थान व्यतिरिक्त गुजरात हे वर्षानुवर्षे तेल उत्पादनात महत्त्वाचे योगदान देत आहे.

तसेच दक्षिण भारतात तामिळनाडूच्या कावेरी खोऱ्यात अनेक तेल आणि वायू क्षेत्रे कार्यरत आहेत. ही सर्व राज्ये मिळून भारताची ऊर्जा सुरक्षा वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

भारतीय कायद्यानुसार आणि घटनात्मक तरतुदींनुसार, देशाच्या भूभागात किंवा प्रादेशिक जलक्षेत्रात (Territorial Waters) आढळणाऱ्या सर्व नैसर्गिक संसाधनांवर, विशेषतः पेट्रोलियमवर केवळ केंद्र सरकारची मालकी असते.

जरी तेल एखाद्या विशिष्ट राज्याच्या हद्दीत किंवा खाजगी जमिनीत सापडले, तरी त्यावर राज्य सरकार किंवा जमीनमालकाचा कोणताही कायदेशीर हक्क नसतो. या संसाधनांच्या उत्खननाचे आणि वितरणाचे सर्व अधिकार केंद्र सरकारकडे राखीव असतात.