
जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे पाकिस्तानातील ४ आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ५ दहशतवादी तळ उद्धवस्त केले.

यात लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या या दहशतवादी मुख्यालयांवर कारवाई करण्यात आली. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय सैन्याने मुजफ्फराबाद, बहावलपूर, कोटली, चाक अमरू, गुलपूर, भिंबर, मुरीदके आणि सियालकोट या ठिकाणी एकापाठोपाठ नऊ ठिकाणी हल्ले केले. काल रात्री साधारण १ च्या आसपास ही कारवाई करण्यात आली.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बारीक लक्ष होते. ते वॉर रूममधून या सर्व ऑपरेशनवर नजर ठेवून होते.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं होतं. महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या पतींवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव ‘मिशन सिंदूर’ ठेवण्यात आले.

या कारवाईनंतर पाकिस्ताननेही अधिकृतपणे याची कबुली दिली आहे. भारतीय सैन्याने मुरीदके येथे लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आणि बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय पूर्णपणे उद्धवस्त केल्याची माहिती दिली आहे.

ही कारवाई अत्यंत अचूक आणि प्रभावी ठरली, ज्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांनाही त्वरित याची दखल घ्यावी लागली.

भारताच्या या हल्ल्यानंतर लाहोर आणि सियालकोट हे एअरपोर्ट पुढच्या 48 तासांसाठी बंद करण्यात आले आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च करताच पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या पुंछ-राजौरी क्षेत्राच्या भीमबेर येथे शस्त्रसंधीच उल्लंघन केलं.