
वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीजमध्ये (India vs West indies T 20 Series) टीम इंडियाने कमालीचं प्रदर्शन केलं आहे. वनडे सीरीजमध्ये आधी क्लीनस्वीप केलं. त्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit sharma) टीमने टी-20 मालिकाही सहज जिंकली. महत्त्वाचं म्हणजे या मालिका विजयानंतर टीम इंडिया तब्बल सहावर्षांनी टी 20 फॉर्मेटमध्ये नंबर एक टीम बनली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज सर्वात धोकादायक संघ समजला जातो. त्या संघाला नमवून भारताने मिळवलेला हा विजय खास आहे. भारताने या मालिकेत अनेक बदल केले. नवीन खेळाडूंना संधी दिली. प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली. तरी भारतीय संघाने वनडे आणि टी-20 दोन्ही मालिकांवर वर्चस्व गाजवलं. टी-20 मधील भारताच्या विजयात सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, ऋषभ पंत, विराट कोहली (Virat kohli) आणि वेंकटेश अय्यर यांनी आपलं योगदान दिलं.

या टी-20 सीरीजमध्ये ऑलराऊंडर वेंकटेश अय्यरने कमालीचं प्रदर्शन केलं. ऑलराऊंडर आणि फिनिशर या दोन्ही रोलवर वेंकटेशने लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे बाहेर असलेल्या हार्दिक पंड्याच्या अडचणी वाढू शकतात. यामागची चार कारणं जाणून घेऊया.

फिनिशर म्हणून वेंकटेश अय्यरने स्वत:ला सिद्ध केलं आहे. टी 20 सीरीजमध्ये अय्यर 15 व्या षटकानंतर फलंदाजीला आला व येताच त्याने आक्रमक फलंदाजी सुरु केली. अय्यरने पहिल्या सामन्यात नाबाद 24, दुसऱ्या सामन्यात 33 आणि शेवटच्या सामन्यात नाबाद 35 धावा केल्या. या दरम्यान अय्यरचा स्ट्राइक रेट 184 होता.

वेंकटेश अय्यर आतापर्यंत फक्त सहा टी 20 सामने खेळला आहे. पण त्याने कठीण प्रसंगात अनुभवी आणि कसलेल्या फलंदाजासारखा खेळ केला. वेंकटेशच टेंपरामेंट खरोखरच कमालीचं होतं. प्रतिकुल परिस्थितीतही त्याचं संतुलन ढासळलं नाही. त्याने योग्य फटक्यांची निवड करुन धावा वसूल केल्या.

वेंकटेश अय्यरने चांगली गोलंदाजीही केली. त्याने सीरीजमध्ये अवघी 3.1 षटकं गोलंदाजी केली. पण त्यात त्याने 2 विकेट घेतल्या. अय्यरने पोलार्डचा विकेट घेतला. त्याने जशी प्लानिंगनुसार गोलंदाजी केली.

वेंकटेश अय्यर डावखुरा फलंदाज आहे. लेफ्टी फलंदाजाला बॉलिंग करताना गोलंदाजांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा यांच्याबरोबरीने डावखुऱ्या वेंकटेश अय्यरच्या फलंदाजीमुळे टीम इंडियाला नक्की फायदा होईल.