
कलर्स मराठी वाहिनीवरील 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत हनुमान जयंतीनिमित्त दाखविण्यात येणारा विशेष भाग प्रेक्षकांसाठी एक गूढ, अध्यात्मिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे. "जगात दैवत्व एकच, देवा देवात भेद केलास आत्मपरीक्षण कर" स्वामींचा हा अलौकिक संदेश या भागात प्रकट होतो.

या विशेष भागात स्वामी समर्थांच्या रूपात हनुमंत तत्वाचा साक्षात्कार होणार असून, स्वामींच्या चमत्कारिक रूपाने भक्तांना नव्या भक्तिभावाची प्रचिती येणार आहे.

या भागात अवधूत नावाच्या एका मारुतीभक्ताची कथा केंद्रस्थानी आहे, जो इतर कोणत्याही देवतेला मानत नाही. स्वामींचा स्वीकार न करणारा हा भक्त मंदिर उभारणीच्या कामात अडथळे येऊ लागल्यामुळे संभ्रमात पडतो. त्याला वाटतं की स्वामी हेच कारण आहेत. मात्र नाट्यमय घटनांनंतर त्याला जाणवतं की स्वामी समर्थ हेच हनुमंत तत्वाचे साक्षात स्वरूप आहेत.

मारुती आणि भीमाच्या ऐतिहासिक भेटीचं प्रभावी रिक्रिएशन या विशेष भागात दाखवण्यात येणार आहे, ज्यामुळे स्वामींच्या शक्तिरूपाचं तेजस्वी दर्शन घडणार आहे. अवधूतला अखेर स्वामींमध्ये हनुमंताचे तत्व जाणवतं आणि तो त्यांच्या पायाशी नतमस्तक होतो.

स्वामी त्याला फक्त मंदिर उभारणीचं नाही, तर एका स्त्रीच्या सन्मानासाठी उभं राहण्याचं महत्त्वाचं कार्य देतात. जसं प्रभू श्रीरामासाठी हनुमानाने सीतेच्या सन्मानासाठी संघर्ष केला होता.