
कल्याण-शिळ रोडवरील प्रवाशांसाठी पुढील तीन दिवस नाहक त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFC) प्रकल्पांतर्गत निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे.

त्यामुळे, आज मध्यरात्री १२ वाजेपासून ते ९ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत या तीन दिवसांसाठी कल्याण-शिळ रोडवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होणार आहे.

दिल्ली ते जेएनपीटीपर्यंत मालवाहू वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी सध्याच्या पुलाची उंची वाढवणे आवश्यक आहे. याच कामासाठी, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीमार्फत पुलाचे पाडकाम व पुनर्बांधणी सुरू करण्यात येणार आहे.

वाहतूक विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशानुसार तात्पुरत्या वाहतूक बदलांची अधिसूचना जारी केली आहे. नागरिकांनी आणि विशेषतः जड-अवजड वाहनांच्या चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा रस्त्यावर डेड लॉक होण्याची शक्यता आहे.

कल्याणहून शिळफाट्याकडे निळजे कमानीजवळ रस्ता बंद असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी उजवीकडे वळून, लोढा पलावाच्या बाजूने कल्याणकडे येणाऱ्या मार्गाचा वापर करून महालक्ष्मी हॉटेलपर्यंत प्रवास करता येईल.

लोढा पलावा/एक्स्पिरिया मॉलकडून कल्याणकडे एक्स्पिरिया मॉलजवळ निळजे पुलाच्या चढणीला प्रवेश बंद असेल. या वाहनांना शिळफाट्याच्या दिशेने जाऊन देसाई खाडी पार करावी लागेल आणि सरस्वती टेक्सटाईलजवळून यू-टर्न घेऊन नवीन पलावा उड्डाणपुलावरून कल्याणकडे जावे लागेल.

तसेच जड वाहनांना कल्याण फाटा, काटई चौक आणि खोणी नाका या मुख्य ठिकाणांवर प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तर कल्याणकडे येणाऱ्या वाहनांसाठी मुंब्रा/कल्याण फाटाकडून येणाऱ्या जड वाहनांना मुंब्रा बायपास आणि खारेगाव टोलनाका मार्गे जावे लागेल.

त्यासोबतच नवी मुंबई/तळोजाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कल्याणकडून येणाऱ्या जड वाहनांना काटई चौक (बदलापूर चौक) येथे प्रवेश बंद असून, त्यांना खोणी नाका - तळोजा एम.आय.डी.सी. मार्गे वळवण्यात आले आहे.

तसेच अंबरनाथ/बदलापूर बाजूकडून येणाऱ्या वाहनांसाठी या वाहनांना खोणी नाका (निसर्ग हॉटेल) येथे प्रवेश बंद आहे. त्यांनी परिस्थितीनुसार तळोजा एम.आय.डी.सी. किंवा बदलापूर पाईपलाईन-नेवाळी मार्गाचा वापर करावा.

हा पूल दिल्ली-जेएनपीटी या देशाच्या महत्त्वाच्या मालवाहतूक मार्गाचा भाग आहे. त्यामुळे, प्रवाशांनी थोडा त्रास सहन करून सहकार्य करावे. तसेच घरातून निघण्यापूर्वी, आपण वापरत असलेला पर्यायी मार्ग खुला आहे की नाही, हे एकदा तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे.