
प्रेम... ज्याची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. पण काही प्रेमकथा अशा असतात, ज्या काळालाही हरवून जातात. जळगावच्या चाळीसगाव शहरात घडलेली ही अशीच एक हृदयस्पर्शी कहाणी. तब्बल ५० वर्षे आपल्या प्रेयसीची वाट पाहणाऱ्या एका प्रेमवीराची ही कथा... रोज रात्री येणाऱ्या पंजाब मेलकडे डोळे लावून बसणारा तो अवलिया... कारण तिने सांगितलं होतं — “तू हो पुढे, मी येतेच... रात्रीच जेवण सोबत करूया.” पण ती कधीच आली नाही.

प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नाही... प्रेम म्हणजे प्रतीक्षा, विश्वास आणि समर्पण. मुंबई येथे शिक्षण घेत असताना जगप्रसिद्ध कलामहर्षी केकी मूस यांचं मन निलोफर मोदींवर जडलं. दोघंही Wilson College मध्ये शिक्षण घेत होते. एका चित्रकला स्पर्धेत केकी यांनी जलरंगात रेखाटलेलं बुद्ध जन्माचं चित्र पाहून निलोफर यांनी त्यांच्या कलेची तोंड भरून स्तुती केली. आणि त्यांच्या कलेच्या प्रेमात पडल्या. आणि इथून सुरू झाला त्यांच्या प्रेमाचा प्रवास.

आयुष्यभर सोबत राहण्याचं स्वप्न पाहत केकी मूस कायमचे चाळीसगाव येथे परतण्याचा निर्णय घेतात. निलोफर त्यांना मुंबई रेल्वे स्थानक पर्यंत सोडायला येतात. गाडी सुटण्याच्या क्षणी ती म्हणते — “तू हो पुढे... मी मागच्या पंजाब मेलने येते. रात्रीच जेवण सोबत करूया.” आणि इथून नियतीने वेगळंच पान उघडलं.

केकी मूस विश्वासाने चाळीसगावात पोहोचले. रात्री पंजाब मेल येण्याची वेळ झाली. गाडी थांबली, प्रवासी उतरले, पण ती आलीच नाही. मात्र त्या एका वचनावर केकी मूस यांनी आयुष्य घालवलं

पुढील तब्बल ५० वर्षे, रोज रात्री पंजाब मेल येईपर्यंत त्यांच्या घराचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या असायच्या, तिच्या स्वागतासाठी...

ती आता येणार नाही, हे माहित असूनही तिच्या शब्दांवरचा विश्वास मात्र त्यांनी कधी सोडला नाही. पंजाब मेल निघून गेल्यावरच ते जेवण करायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच प्रतीक्षा... तीच आस...

या प्रतीक्षेच्या वेदनेतूनच त्यांनी स्वतःला कलेत झोकून दिलं. स्वतःच्या घरात उभारलं एक जगविख्यात कलादालन — केकी मूस कला दालन. आजही ही वास्तू त्यांच्या प्रेमाची आणि त्यागाची साक्ष देते. त्यांच्या निधनानंतरही ही वास्तू जपली जात आहे.

५० वर्षे... एकच आशा... एकच वचन... आणि अखंड प्रतीक्षा. आजच्या वेगवान युगात प्रेमाच्या बदलत्या व्याख्यांमध्ये केकी मूस यांची ही कथा खऱ्या प्रेमाचं एक अनोखं उदाहरण ठरते. प्रेम कधी कधी मिळण्यात नसतं... तर आयुष्यभर वाट पाहण्यातही असतं.

निलोफरच्या पत्रानंतर बाबूजींच्या मनात ज्या भावना उचंबळून आल्या त्याबद्दल त्यांनी आत्मचरित्रात लिहीलं आहे. निलोफरचं पत्र वाचल्यावर माझ्या हृदयात काहीतरी तुटलं, असं वाटलं. निलोफर आता मला मिळणार नाही या सत्याला मी सामोरा गेलो. आता माझ्या आयुष्यातलं प्रेम संपलं आहे. मला प्रेमाशिवाय माझं निरस बेचव आयुष्य जगायचं आहे. अशा रितीने मी आयुष्याला सामोरं जायची तयारी केली असं बाबूजूंनी आत्नचरित्रात लिहील, अशी आठवण विकास बलवंत शुक्ल यांनी सांगितली.