
भारत आणि पाकिस्तान दरम्यान आतापर्यंत 4 युद्ध झाली आहेत. प्रत्येक युद्धात काश्मीरचा मुद्दाच महत्त्वाचा राहिला आहे. आता पहलगाममधील हल्ल्यानंतर देशभरात संताप उसळला आहे. या हल्ल्यानंतर भारत आपल्याला सोडणार नाही हे पाकिस्तान समजून चुकला आहे. दुसरीकडे भारतातही बैठका सुरू आहेत. मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. त्यामुळे यावेळीही युद्धाचे ढग जमले आहेत. विशेष म्हणजे युद्ध झाले तर यावेळीही काश्मीर हाच महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये सर्वात पहिलं युद्ध 1947-1948 मध्ये झालं होतं. 22 ऑक्टोबर रोजी सुरू झालेलं हे युद्ध 1 जानेवारी 1949 पर्यंत सुरू होतं. म्हणजे सुमारे 1 वर्ष दोन महिने (436 दिवस) हे युद्ध सुरू होतं. जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर हे युद्ध झालं. जम्मू-काश्मीरवर ताबा मिळवण्यासाठीचं हे युद्ध होतं. त्याचा परिणाम असा झाला की यूएनद्वारे सीजफायर करण्यात आलं आणि काश्मीरचं विभाजन झालं.

1965 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये दुसरं युद्ध झालं. 5 ऑगस्ट 1965 ते 23 सप्टेंबर 1965 पर्यंत म्हणजे 50 दिवस हे युद्ध चाललं. ऑपरेशन जिब्राल्टरद्वारे पाकिस्तानने घुसखोरी केली होती. त्यामुळे हे युद्ध झालं. त्याचा परिणाम म्हणजे पुन्हा यूएनने सीजफायर केलं आणि ताश्कंद करार झाला. हे युद्धही काश्मीरच्या मुद्द्यावरूनच झालं होतं.

1971मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान तिसरं युद्ध झालं होतं. 2 डिसेंबर 1971 ते 16 डिसेंबर 1971 म्हणजे 13 दिवस हे युद्ध चाललं. युद्धाचं कारण म्हणजे पूर्व पाकिस्तानात बंगाली मुक्ती आंदोलन सुरू होतं. त्याला भारताने पाठिंबा दिला होता. या युद्धाचा परिणाम म्हणजे स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. 13 दिवसाचं हे युद्ध बांगलादेशाच्या निर्मितीनंतरच थांबलं.

1999 मध्ये कारगिल युद्ध झालं. 3 मे 1999 ते 26 जुलै 1999 म्हणजे अडीच महिने हे युद्ध चाललं होतं. पाकिस्तानी सैनिकांनी आणि दहशतवाद्यांनी काश्मीर सेक्टरमध्ये घुसखोरी केली होती. त्यामुळे हे युद्ध झालं होतं. जवळपास दोन महिने आणि तीन आठवडे म्हणजे 85 दिवस युद्ध सुरू होतं. या चारही युद्धांमध्ये सर्वात अधिक काळ चाललेलं युद्ध म्हणजे काश्मीर युद्ध होतं. ते जवळपास 14 महिने चाललं. तर सर्वात कमी काळ चाललेलं युद्ध 1971चं होतं. ते 13 दिवस चाललं होतं.