
भारतीय क्रिकेटला अनेक स्टार खेळाडूंचं योगदान लाभलं, ज्यांच्या खेळाने भारतीय क्रिकेटची जगात वाहवा झाली, नाव मिळालं. एक काळ होता ज्या काळात 'शिकून सवरुन मोठा हो' असं मध्यमवर्गीय घरातले आईबाबा सांगायचे. पण कृष्णमचारी श्रीकांत या खेळाडूने उच्च शिक्षण तर घेतलंच पण आपल्या खेळाने जागतिक क्रिकेट विश्वाला आपल्या नावाची दखल घ्यायला लावली.

श्रीकांत यांचा जन्म 21 डिसेंबर 1959 साली तेव्हाच्या मद्रास (सध्या चेन्नई) येथे झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण मद्रासमध्ये पूर्ण केले आणि याचदरम्यान त्यांनी क्रिकेट देखील सुरु केले. भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी तमिळनाडूसाठी रणजी करंडक खेळून आपला बहारदार खेळ दाखवला. खेळाबरोबर श्रीकांत यांना अभ्यासाचीहीह गोडी होती. त्यांनी चेन्नईच्या प्रसिद्ध अण्णा विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बी.टेक. केले.

श्रीकांत पुढे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये आपल्या करियरचं स्वप्न पाहत होते त्यापूर्वीच त्यांना भारतीय क्रिकेट संघाचं बोलावणं आलं. श्रीकांत यांनी 1981 मध्ये भारतीय संघात प्रवेश केला. त्यानंतर, त्यांनी ज्या प्रकारे जगातल्या भल्या भल्या बोलर्सला 440 व्होल्ट्सचे झटके द्यायला सुरुवात केली, त्यावरुन हे रसायन काहीतरी अजब आहे, याची जाणीव निवड समितीला झाली. तेव्हापासून त्यांची संघात जागा फिक्स झाली. त्यांनी 90 च्या दशकात प्रतिस्पर्धी बोलर्सवर सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये हुकुमत गाजवली पुढे जाऊन ते ओपनर बॅट्समनसाठी आयडॉल बनले.

कारकिर्दीच्या केवळ 2 वर्षांतच श्रीकांत यांना मोठं बक्षीस मिळालं.1983 मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात भारतीय संघाने क्रिकेट विश्वाला धक्का दिला. 'डेव्हिल्स ऑफ कपिल' संघाने अंतिम फेरीत दिग्गज वेस्ट इंडिज संघाला 43 धावांनी हरवून विजेतेपद पटकावलं. या लो स्कोरिंग मॅचमध्ये श्रीकांतने 38 धावा केल्या, ज्या दोन्ही संघातील फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा होत्या.

श्रीकांत यांनी 43 कसोटी सामन्यांमध्ये 2062 रन्स केले. ज्यामध्ये 2 शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर 146 एकदिवसीय सामन्यात 4 शतके आणि 27 अर्धशतकांसह त्यांनी 4091 रन्स केले. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे अध्यक्षही होते.