
झी मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मी निवास' या मालिकेची कथा अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. गाडे पाटलांच्या घरी महाशिवरात्रीची पारंपरिक पूजा दरवर्षी अत्यंत भक्तिभावाने साजरी केली जाते. या पूजेची एक खास परंपरा आहे.

दरवर्षी शंकराची एक नवीन पिंड बनवली जाते आणि त्या पिंडीच्या पूजेनंतर विधीवत स्थापना केली जाते. या वर्षीही घरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळणार आहेत. संपूर्ण कुटुंब या महत्त्वाच्या दिवशी एकत्र आलेलं आहे.

सिद्धू आणि भावना यावर्षीच्या पूजेसाठी बसणार हे आधीच ठरलेलं आहे. ठरल्याप्रमाणे सिद्धू पिंड घ्यायला निघतो. मात्र, या दरम्यान निलांबरीने रचलेल्या कटकारस्थानामुळे मोठा अडथळा निर्माण होतो.

सिद्धूचा गुंडांसोबत सामना होऊन एक थरारक फाइट रंगणार आहे. या संघर्षानंतर सिद्धूचा दुग्धाभिषेक केला जातो. त्यानंतर विधीपूर्वक पिंड घेऊन घरी परततो. सर्वांच्या उपस्थितीत पूजा सुरु होते.

दरम्यान, या विशेष कार्यक्रमात जान्हवी सगळ्यांसमोर येणार असल्याने तिचीही एण्ट्री विशेष ठरणार आहे. काहीही झालं तरी ती जयंतकडे परत जाणार नाही, हे ठामपणे सांगते. जान्हवीच्या गाण्याच्या दरम्यान सर्वांच्या नजरा तिच्यावर आहेत. जान्हवी सगळ्यांसमोर येते आणि तिला पाहून सगळ्यांना मोठा धक्का बसणार आहे.