Asia Cup Trophy Controversy : खेळता तरी कशाला? ट्राॅफी नाकारल्याने भारताचाच माजी खेळाडू प्रचंड संतापला, सगळ्यांचीच बोलती बंद
आशिया कपमधील ट्रॉफीच्या वादावर भारताचे माजी क्रिकेटपटूने संताप व्यक्त केला आहे. भारताने अशा परिस्थितीत पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही ट्रॉफीसाठी खेळू नये, अशी भूमिका त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मांडली.

महिला आशिया कप २०२६ च्या फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि संघाने आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.
सलग दुसऱ्यांदा घडलेल्या या प्रकारावर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू मदन लाल यांनी 'एक्स'वर पोस्ट करत संताप व्यक्त केला आणि भारत जर असे वागणार असेल तर पाकिस्तानविरुद्ध खेळूच नये, असे म्हटले आहे.
२०१२-१३ नंतर दोन्ही देशांत कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. भारत केवळ बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळतो, मात्र, पाकिस्तानचा दौरा करण्यास भारताचा ठाम नकार आहे.
महिला आशिया कपमध्ये भारताला श्रीलंकेविरुद्ध खेळण्यास कोणताही आक्षेप नव्हता, परंतु बक्षीस वितरण समारंभात मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यावरून संपूर्ण वाद निर्माण झाला.
फायनल सामन्यात शेफाली वर्मा व स्मृती मानधना यांच्या १२९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने १८३ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १११ धावांत बाद झाला आणि श्री चरणीने सर्वाधिक ४ बळी घेतले.