भारताचं 60 वर्षांपूर्वीचं ते गाणं, इराणच्या युद्धात झालं तुफान व्हायरल; लिरिक्समुळे इंटरनेटवर ट्रेंडिंगला; त्यात नेमकं काय आहे?
इराण आणि जगाच्या अनेक भागांमध्ये वाढता तणाव, युद्धसदृश परिस्थिती आणि मानवी संकट असताना, एक जुने गाणे अचानक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक याला शांतता, एकता आणि मानवतेचा संदेश म्हणत आहेत. हे गाणे कोणते आहे जाणून घ्या...

हिंदी चित्रपटसृष्टीचे महान गायक मोहम्मद रफी यांनी १९४० ते १९८० पर्यंत आपल्या जादुई आवाजाने लाखो-करोडो लोकांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या गाण्यांसाठी लोक कॅसेट्स विकत घेत आणि चित्रपटगृहात तासन्तास बसून राहत. रफी साहेबांच्या गाण्यांची लोकप्रियता भारताच्या सीमेपलीकडेही होती.

आता इराण आणि अमेरिकेतील युद्धाच्या तणावाच्या दरम्यान मोहम्मद रफींचे एक इंग्रजी गाणे अचानक व्हायरल झाला आहे. ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर हे गाणे मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

रफी साहेबांनी आपल्या कारकिर्दीत फक्त दोन इंग्रजी गाणी गायली होती. त्यापैकी एक आहे ‘Although We Hail from Different Lands’. हे गाणे १९६६ च्या ‘सूरज’ चित्रपटातील प्रसिद्ध गीत ‘बहारों फूल बरसाओ’च्या धुनेवर आधारित आहे. दुसरे गाणे ‘The She I Love Is A’ हे १९६५ च्या ‘गुमनाम’ चित्रपटातील ‘हम काले हैं तो क्या हुआ’ या गाण्याच्या धुनेवर तयार झाले आहे.

दोन्ही गाण्यांचे बोल प्रसिद्ध कवी हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी लिहिले होते, पण ते कोणत्याही चित्रपटात वापरले गेले नव्हते. १९७० मध्ये सारगामा कंपनीने ‘Although We Hail from Different Lands’ हे गाणे रिलीज केले होते. २०२० मध्ये सारगामाने हे गाणे आपल्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध केले. या गाण्यातील ओळी आजही मनाला स्पर्श करतात. “आम्ही वेगवेगळ्या देशांतून येऊ शकतो, पण आपली पृथ्वी, आकाश आणि सूर्य एकच आहे.”

रफी साहेबांनी या गाण्यात युद्ध, द्वेष आणि संघर्षाविरुद्ध आवाज उठवला आणि मानवांना एकत्र, सौहार्दाने राहण्याचे आवाहन केले होते. हे गाणे ‘कोल्ड वॉर’च्या काळात तयार झाले होते, तरीही आज इराण-यूएस तणावाच्या पार्श्वभूमीवर ते पूर्णपणे लागू पडते. सध्या जेव्हा जगात तणाव वाढत आहे, तेव्हा हे गीत शांततेचे प्रतीक बनून समोर आले आहे. लोक ते शेअर करताना म्हणत आहेत की, जगाला युद्ध नको, तर एकमेकांशी प्रेम, समजूत आणि शांतता हवी आहे. गाण्यातील ओळ – “We want no hate, we want no strife… आम्हाला द्वेष नको, आम्हाला कलह नको, कारण आम्ही प्रेम आणि जीवनासाठी जन्मलो आहोत” – आजच्या परिस्थितीशी अगदी जुळते.