
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या एका विमानाचा लँडिंग करतेवेळी मोठा अपघात होता होता थोडक्यात वाचला. कोचीहून आलेल्या एअर इंडियाच्या एआय२७४४ या एअरबस विमानाचे लँडिंग सुरु असताना मुसळधार पावसामुळे ते धावपट्टीवरून घसरले.

या घटनेत विमानाचे तीन टायर फुटले असून विमानाचे इंजिनही खराब झाले आहे. मात्र, सुदैवाने विमानमधील सर्व प्रवासी आणि केबिन क्रू सुरक्षित असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी मुंबईत जोरदार पाऊस कोसळत होता. याच वेळी, एअर इंडियाचे एआय२७४४ हे विमान मुंबई विमानतळाच्या ९/२७ या मुख्य धावपट्टीवर उतरत होते. त्यावेळी विमानाचा वेग अंदाजे २४० किलोमीटर प्रति तास इतका होता.

मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे धावपट्टीवर साचलेल्या पावसाच्या पाण्याचा एक थर निर्माण झाला होता. ज्यामुळे विमानाची चाके घसरली आणि वैमानिकाचे नियंत्रण सुटले. यामुळे विमान धावपट्टीवरून काही अंतरावर घसरले.

मात्र या धोकादायक परिस्थितीतही वैमानिकाने प्रसंगावधान राखत तात्काळ आवश्यक उपाययोजना केल्या. त्यांच्या कौशल्यामुळे आणि त्वरित केलेल्या कार्यवाहीमुळे काही वेळातच विमानाला पुन्हा धावपट्टीवर आणण्यात यश आले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

मात्र, या घटनेमुळे विमानतळाच्या मुख्य धावपट्टीचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेनंतर मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. यामुळे विमानतळावरुन काही विमानांना उशीर झाला, तर काही विमान पर्यायी धावपट्टीवर वळवण्यात आले.

या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, याबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

विमानाचे टायर फुटण्यामागे तांत्रिक बिघाड होता की केवळ नैसर्गिक कारणामुळे हा प्रकार घडला, याचा सखोल तपास केला जाईल, असे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एअर इंडियानेही या घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून, प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.