Nivedita Saraf : मराठी मुलींना घाटन म्हणायचे..निवेदिता सराफांनी सांगितला हिंदी मालिकेच्या सेटवरील धक्कादायक अनुभव
Nivedita Saraf: मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ या सध्या चर्चेत आहेत. त्यांनी 1984 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी मालिकेच्या सेटवरील धक्कादायक अनुभव सांगितला आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या...

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून निवेदिता सराफ या ओळखल्या जातात. त्या लवकरच 'कृष्णाईच्या लेकी' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेच्या निमित्ताने त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी हिंदी मालिकेच्या सेटवरील धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

निवेदिता सराफ यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये यह जो जिंदगी या मालिकेत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. त्या मराठी असल्यामुळे सेटवर त्यांना कसा अनुभव आले हे त्यांनी सांगितले आहे.

'आईनेच आम्हाला लहानपणासून खंबीर बनवलं. यशाबरोबर अपयश कसं पचवायचं, हे तिनेच शिकवलं. त्याचबरोबर एखादं काम करण्यासाठी जे डेडिकेशन लागतं ते सगळं आईने दिलं. याचा एक प्रसंग सांगेन. मी १९८४ मध्ये 'यह जो जिंदगी' नावाची मालिका करत होते' असे निवेदिता सराफ म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, 'यह जो जिंदगी या मालिकेच्या वेळेला मला उच्चारावरून खूप चिडवलं गेलं. तेव्हा हिंदी मालिकांचे वर्चस्व होते. त्यावेळी हिंदीत काम करणाऱ्या मराठी मुलींना घाटन म्हणायचे. मला त्याचे खूप वाईट वाटायचे. मला माझ्या हिंदी उच्चारांवरुन इतकं चिडवायचे की, मी एके दिवशी सेटवरून रडत घरी आले.'

निवेदिता सराफ पुढे म्हणाल्या की, मी आईला घरी येऊन सांगितलं की मी मालिका सोडतेय. कारण, मला तिथे माझ्या उच्चारावरून खूप चिडवतात. सारखं माझं हसू होतं, मला त्याचा खूप त्रास होत होता. मी अभिनय कसा करते, या गोष्टी बाजूलाच राहतात आणि फक्त माझ्या उच्चारांवर येतं. तर आई म्हणाली, 'हे बघ मालिका सोडून घरात बसणे खूप सोपी गोष्ट आहे. ते लोक जर तुला हिंदीवरून हसत असतील तर तू त्यांना उर्दू बोलून दाखव. त्यानंतर मी उर्दू शिकले.