
ग्रीष्म ऋतू सुरु झाल्यानंतर उन्हाच्या काहिलीने अंगाची लाहीलाही होते. आपण शरीराला थंडावा शोधण्यासाठी एसी, कुलर, पंखा याचा वापर सुरु करतो. पण श्री विठ्ठलाच्या मूर्तीला ही उष्णतेचा त्रास होऊ नये, म्हणून सर्वांगाला चंदन लावण्याची परंपरा पंढरपुरात अनेक शतकांपासून आजही सुरु आहे.

अलंकारापेक्षाही सुंदर उठून दिसणारे विठ्ठलाचे रूप डोळ्यात साठ्वण्यासारखे आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीला थंडावा मिळावा यासाठी खास चंदन उटी पूजा केली जाते. चैत्र महिना सुरु झाला कि उष्णता वाढू लागते. चंदनाचा लेप या काळात शरीर थंड ठेवतो आणि उष्णतेपासून बचाव करतो.

चंदनाला आयुर्वेदातही महत्त्व आहे. चंदन हे अतिशय सुगंधी, शीतल असते. चंदनाच्या याच गुणामुळे दिवसभरातील हवेतील उष्णतेने शिणलेल्या विठू माउलीला शीतलता वाटावी यासाठी रोज दुपारी सुगंधी अशा चंदनाचा लेप सर्वांगाला लावला जातो.

गुढी पाडवा ते मृग नक्षत्र निघेपर्यंत रोज दुपारी चंदन उटी पूजा केली जाते. पूजेनंतर देवाला नैवेद्य म्हणून कैरीच पन्हं आणि थंड लिंबू सरबतही दाखवले जाते.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने चंदन उटी पूजेसाठी उच्च प्रतीचे 500 किलो चंदन कर्नाटकामधील बंगलुरू, म्हैसूर मधून खरेदी केले आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठीसाठी रोज एक किलो चंदन उगाळले जाते.

यासाठी मंदिर समितीने अध्ययावत अशी चंदन उगाळण्यासाठी मशीन आणल्या आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणीची मृग नक्षत्र निघेपर्यंत चंदन उटी पूजा केली जाते. यासाठी अजूनही भाविक आपली मागणी नोंदवू शकतात.

पूजेचा आनंद घेऊ शकतात. यासाठी त्यांनी मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईट वर भेट देऊन आपली पूजा नोंदवावी, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

विठुरायाचे रूप डोळे भरून पाहण्याची संधी या उटी पूजेमुळे मिळते. सुवर्णालंकारापेक्षाही देखणे रूप चंदन उटी पूजेमध्ये दिसते, अशी पूजा करणाऱ्याला जगण्याची उर्जा मिळते, अशीही भावना भाविकांनी व्यक्त केली. म्हणून अनेक भाविक चंदन उटी पूजा करून समाधान मानतात, असे भाविक पिंटू तापडिया यांनी सांगितले.