

देशातील अनेक महत्वपूर्ण मंदिरे सदैव दहशतवाद्यांचे टार्गेट राहिले आहे. त्यामुळेच पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक व पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मंदिराच्या सुरक्षेसाठी वर्षाकाठी लाखो रुपये शासन व मंदिर समिती खर्च करीत आहे. परंतु या मंदिराची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे" विठ्ठल" भरोसे असल्याचे चित्र आहे.

विठ्ठल मंदिराच्या व्हीआयपी प्रवेशद्वारात पोलिसांचा सदैव मोठा फौजफाटा असला तरी या ठिकाणी बसविण्यात आलेली उपकरणेच गायब झाली आहेत. मंदिरात काही मोठी घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आता भाविकातून विचारला जात आहे.

मंदिर परिसरात वाहन आणण्यास प्रतिबंध आहे. मात्र मंदिर परिसरात अगदी मंदिराच्या भिंतीला लागूनच अनेक दुचाकी व चारचाकी वाहने उभी केलीली दिसून येत आहे. यापूर्वी धार्मिक स्थळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वाहनांचाच वापर केलेला होता. हे अनेक वेळा निष्पन्न झाले. त्यानंतर विठ्ठल मंदिर परिसरात बिनदिक्कतपणे वाहने उभी केलेली दिसून येत आहेत.

मंदिरात डॉग स्क्वाडच्या सहाय्याने मंदिराच्या आतील बाजूची तपासणी केली जाते. परंतु या मंदिरात जाणारे अनेक पुजारी, कर्मचारी विना तपासणी करता सोडले जातात. यामुळे विठ्ठल मंदिराची सुरक्षा आता विठ्ठल भरोसे झाली आहे.