कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात रविवारी रात्रीपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शहर आणि गावांमध्ये पोलिसांकडून दुकाने, हॉटेल्स यांसह विविध आस्थापने बंद करण्यात आली आहे.
मुंबईतही रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी मरिन ड्राईव्ह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका परिसरात रस्ते रिकामे केले.
नाईट कर्फ्यू
राज्य सरकारकडून रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर करावाईचे आदेशही देण्यात आले आहेत. रात्रीची संचारबंदी आदेश 15 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.
चित्रपटगृह, मॉल, उपहारगृहे, सार्वजनिक उद्याने, चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणांवर संचारबंदी आदेश लागू असतील. उपहारगृहे बंद राहणार असली तरी होम डिलिव्हरीची सुविधा सुरु ठेवण्यात आलीय.
पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्यानुसार प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं जात आहे.