
शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी एक बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज विधान भवन, मुंबई येथे झाली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, गिरीश महाजन, अब्दुल सत्तार, विजय गावित, अतुल सावे, संजय राठोड इत्यादी यावेळी उपस्थित होते.

माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आदिवासींच्या जमिनी, वनहक्क दावे, वन अतिक्रमण, वीज, शेतीकर्ज, गायरान जमिनी, कांदा असे विविध प्रश्न मांडले. राज्य सरकारतर्फे त्यांच्या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.

नाशिक येथून शेतकऱ्यांचा लाँगमार्च निघाला असून माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी शिष्टमंडळाने आज विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या बैठकीत परंपरागत पद्धतीने आदिवासी कसत असलेल्या जमिनी, वनहक्क दावे, कांद्याचा प्रश्न, वनांमधील अतिक्रमणे, गायरान जमिनी, शेतकऱ्यांना बारा तास वीज, शेती विषयक कर्ज आदी विविध मुद्यांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी माजी आमदार श्री. गावित यांनी विविध मागण्या मांडल्या. त्यावर राज्य शासनाने दाखविलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल श्री. गावित यांनी आभार व्यक्त केले.

शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून आज शेतकरी लाँग मार्चच्या शिष्टमंडळाबरोबर सर्व मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे.