
पुण्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील पूल तुटल्याने 30 पेक्षा जास्त लोक वाहून गेले होते. यातील बऱ्याच पर्यटकांना बचाव पथकांने बाहेर काढलं आहे.

तर या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आहे. दरम्यान आता या दुर्घटनेत बचावलेल्या एका पर्यटकाने दुर्घटनेचा थरारक अनुभव सांगितला आहे.

अवघ्या तीन सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं, असं या पर्यटकाने म्हटलं आहे.

इंद्रायणी नदीच्या दुर्घटनेत गणेश पवार नावाची व्यक्ती सुदैवाने बचावली आहे. त्यांनी पूल नेमका कसा कोसळला? याची सविस्तर माहिती दिली आहे. या दुर्घटनेत माझी दुचाकी वाहून गेली, असं त्यांनी म्हटलंय.

तसेच हा अपघात अवघ्या दोन ते तीन सेकंदांत घडला. पूल कोसळत असताना मी एका ठिकाणी पकडले. त्यामुळे सुदैवाने मी वाचलो, अशी माहिती गणेश पवार यांनी दिली.

तसेच, आमचं या पुलावरून रोज येणं-जाणं असतं. हा पूल जीर्ण झालेला आहे. हा पूल पूर्णपणे वाकलेला होता. हा पूल मधोमध पडला आहे, असं गणेश पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, या दुर्घटनेमुळे वाहून गेलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या परिसरात रुग्णवाहिका आहेत. एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य केले जात आहे.