ना चमक-धमक, ना आलिशान महाल.. असं दिसतं 7 कोटींमध्ये ‘रामायण’ बनवणाऱ्या रामानंद सागर यांचं घर
रामानंद सागर यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत साधं होतं. ते दिखाऊपणाला फार महत्त्व देणारे नव्हते. 2005 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतरही 'सागर व्हिला' त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचा राहिला आहे. त्यांचा मुलगा प्रेम सागर हे आजही तिथेच राहतात.

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. तर दुसरीकडे यामुळे रामानंद सागर यांची 'रामायण' ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 1987 मध्ये जेव्हा दूरदर्शनवर ही मालिका प्रसारित व्हायची, तेव्हा संपूर्ण देश टीव्हीसमोर बसायचा.

39 वर्षांपूर्वी रामानंद सागर यांनी 'रामायण' ही मालिका जवळपास 7 ते 9 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवली होती. आजकाल तर चित्रपटातील एका सीनवरच इतके पैसे खर्च होतात. इतक्या मोठ्या कलाकृतीची निर्मिती करणाऱ्या रामानंद सागर यांचा बंगला कसा दिसतो, हे तुम्हाला माहीत आहे का?

सामान्य दिसणारे रामानंद सागर यांचं घरसुद्धा अत्यंत सर्वसाधारण आहे. ते मुंबईतील जुहू परिसरात राहायचे. 'सागर व्हिला' नावाने त्यांचं हे घर आहे. एनएस रोड नंबर 11 वरील हे घर खूपच सामान्य आहे. रामानंद सागर आज हयात नसले तर त्यांचे कुटुंबीय याच घराच राहतात.

आजकाल मोठमोठ्या कलाकारांचं आणि दिग्दर्शकांचं घर अत्यंत आलिशान असल्याचं पहायला मिळत. परंतु 'सागर व्हिला'चं इंटेरिअरसुद्धा सर्वसामान्य आहे. बाहेरून हा बंगला अत्यंत शांत आणि प्रतिष्ठित असं दिसतं. रामानंद सागर यांनी रामायण, श्रीकृष्ण, विक्रम वेताळ यांसारख्या मालिकांच्या कथा लिहिल्या आहेत.

इतकंच नव्हे तर बजेटच्या कमतरतेमुळे काही मालिकांचं शूटिंगसुद्धा याच घरात करण्यात आलं होतं. म्हणजेच रामानंद सागर यांचं हे घर फक्त राहण्याचं ठिकाण नसून भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. 'विक्रम और बेताल' या मालिकेचं चित्रीकरण याच 'सागर व्हिला'मध्ये झालं होतं.