IPL 2026 : ‘रोहित शर्माने डोळ्यासमोर त्याचं साम्राज्य उद्धवस्त होताना पाहिलं, किमान आता तरी त्याला…’
Mumbai Indians IPL 2026 : हार्दिक पंड्याने संपूर्ण तीन सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच नेतृत्व केलं. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला कॅप्टन म्हणून आणलं. पण हा निर्णय चालला नाही, असं म्हणणं आता चुकीचं ठरणार नाही.

हार्दिकच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची टीम तळाला होती. आयपीएल 2026 मध्ये सुद्धा हीच स्थिती आहे. रोहित शर्माने त्याच्या नजरेसमोर मुंबई इंडियन्सचा गौरव उद्धवस्त होताना पाहिला असं माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी म्हणाला. पुढच्या सीजनसाठी पुन्हा रोहितकडे कॅप्टन्सी द्या अशी इच्छा तिवारीने बोलून दाखवली.

मागच्या तीन वर्षात रोहित शर्माने त्याच्या डोळ्यासमोर त्याने बनवलेलं साम्राज्य उद्धवस्त होताना पाहिलं, असं मनोज तिवारी क्रिकबझशी बोलताना म्हणाला. "डगआऊटमध्ये रोहित बसलेला असताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून हे लक्षात येतं. जर, त्याच्या हातात सूत्र असती तर त्याने असे निर्णय घेतले नसते हे त्याला ठाऊक आहे" असं तिवारी म्हणाला.

"2027 च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सकडे नवीन कॅप्टन असेल हे निश्चित आहे. सूर्यकुमार यादवकडे नेतृत्वाची धुरा जाईल अशी मला अपेक्षा आहे. पण मला वाटतं रोहितकडे नेतृत्व द्यावं" असं मनोज तिवारी म्हणाला.

"मला 200 टक्के खात्री आहे, पुढच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सकडे नवीन कॅप्टन असेल. सूर्यकुमार यादव किंवा जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाज आहे. त्याला इजा होऊ शकते हे ध्यानात घेऊन ते सूर्यकुमार यादवला कॅप्टन बनवू शकतात" असं मनोज तिवारी म्हणाला.

मला मनापासून रोहितकडे कॅप्टनशिप द्यावी असं वाटतं. कॅप्टन बनवून त्याचा आदर त्याला परत द्या. तो जर कॅप्टन म्हणून आला, तर पुन्हा एकदा चांगली टीम बांधण्यासाठी तो सक्षम आहे असं मनोज तिवारीने मत व्यक्त केलं. हार्दिक पंड्याला कॅप्टन बनवून रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना रिटेन करण्याचा निर्णय चालला नाही, असं मुरली कार्तिकने म्हटलं.