
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकले. हे चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता गुजरातमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यावेळी ताशी ११५ ते १२५ किलोमीटर वेगाने हवा वाहत होती. सौराष्ट्र किनाऱ्यावर दाखल होताना त्याचा वेग १४० किलोमीटर झाला.

या चक्रीवादळामुळे सौराष्ट्र किनाऱ्यावर १० ते १४ मीटर उंच लाटा उसळल्या. मुसळधार पाऊस पडला. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले. अरबी समुद्रात दहा दिवसांपासून असलेले हे वादळ गुजरातमध्ये पोहचल्यावर सुपर सायक्लोन झाले.

सध्या चक्रीवादळ गुजरातमधील जाखाऊ बंदरापासून सुमारे 70 किमी (पूर्व-उत्तर-पूर्व), नलियापासून 50 किमी (ईशान्य-पूर्व) अंतरावर आहे. आज दुपारपर्यंत ते सौराष्ट्र आणि कच्छच्या अनेक भागात पोहोचेल. त्याच वेळी, चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत हळूहळू कमकुवत होईल आणि त्याचा प्रवास राजस्थानकडे सुरु होणार आहे.

गुजरातमधून पुढे गेल्यावर ते राजस्थानमध्ये प्रवेश करेल. यादरम्यान अनेक भागात 10 ते 20 सेमी पाऊस अपेक्षित आहे. हवामान खात्यानुसार, गुजरातसह दक्षिण-पश्चिम राजस्थानच्या अनेक भागात शुक्रवारी मुसळधार पाऊस पडेल.

शुक्रवारी दुपारपर्यंत वादळ कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, शनिवारीही त्याचा प्रभाव राजस्थानमध्ये दिसून येईल. रविवारी पूर्व राजस्थान, लगतच्या हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पाऊस पडू शकतो.

चक्रीवादळ बिपरजॉयने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश केला. चक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अजूनही सुरूच आहे. वादळामुळे हजारो झाडे आणि शेकडो विद्युत खांब उन्मळून पडल्याने सुमारे 1000 गावे अंधारात बुडाली आहेत.

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन सरकारने यापूर्वीच 74 हजार लोकांचे स्थालांतर केले होते. या लोकांची शेल्टरमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ज्या ज्या परिसराला वादळाचा फटका बसणार आहे. त्या परिसरात मोठी खबरदारी घेतली होती. एअरक्राफ्टची तयारी होती. त्यामुळे जिवित हानी जास्त झाली नाही