
ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करत भारताने त्यांना टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर ढकलले आहे. त्याचे सर्वात मोठे श्रेय हे भारतीय कर्णधार रोहित शर्माला जाते. कांगारूंविरुद्ध रोहित शर्माने ४२ बॉलमध्ये ९२ धावांची तुफानी खेळी केली होती. या स्पर्धेत दोन अर्धशतके झळकावणाऱ्या रोहित शर्माकडून आजही चांगली सुरुवात करण्याची अपेक्षा असेल.

भारताविरुद्ध इंग्लंडच्या कर्णधाराचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. बटलर हा मोठ्या शॉट्स खेळण्यासाठी ओळखला जातो. अमेरिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने फिरकीपटू हरप्रीतला एकापाठोपाठ एक सलग पाच सिक्स ठोकले होते. या विश्वचषकाच्या सहा डावांमध्ये जोस बटलरने 48 च्या सरासरीने 191 धावा केल्या आहेत.

भारताचा 360 डिग्री खेळाडू सूर्यकुमार यादव या विश्वचषकात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अफगाणिस्तान आणि अमेरिकेविरुद्ध त्याने अर्धशतके झळकावली आहेत. सूर्याने विश्वचषकात सहा सामन्यांत १४९ धावा केल्या आहेत. तो कोणत्याही बॉलरच्या बॉलिंगवर फटकेबाजी करु शकतो.

इंग्लंडचा लेगस्पिनर आदिल रशीद कोणत्याही फलंदाजीची जोडी तोडण्यात माहिर आहे. तो देखील आता चांगल्या फॉर्मात आहे. स्पर्धेतील सात सामन्यांत त्याने नऊ विकेट्स घेतल्या आहेत. ओमानचा संघ अवघ्या 47 धावांत ऑलआऊट झाला तेव्हा रशीदने 11 धावांत चार बळी घेतले होते.

गायनच्या संथ खेळपट्टीवर कुलदीप यादव आपली जादू दाखवू शकतो. त्याला फक्त तीन सामने खेळण्याची संधी मिळाली असून त्यात त्याने सात विकेट्स घेतल्या आहेत. संघात आल्यापासून तो विरोधी संघाची मधली फळी उद्ध्वस्त करत आहे. कुलदीपची गुगली वाचणे प्रत्येक फलंदाजाच्या आवाक्यात नाही.