
भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका 3-1 ने खिशात घातली. त्यामुळे पाचवा सामना हा औपचारिक असणार आहे. भारताविरुद्ध 2012 पासून इंग्लंडने एकही टी20 मालिका जिंकलेली नाही. दुसरीकडे, भारताने आपल्या देशात खेळताना 2018 मध्ये शेवटची टी20 मालिका गमावली होती. त्यानंतर अजून पाठी वळून पाहिलेलं नाही.

भारताने घरच्या मैदानावर 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-0 ने टी20 मालिका गमावली होती. पण त्यानंतर एकही टी20 मालिका गमावलेली नाही. 2019 पासून मालिका विजयाची चव चाखत आहे. टीम इंडियाने 2019 पासून आतापर्यंत सलग 17 टी20 मालिका जिंकल्या आहेत.

टी20 क्रिकेटमध्ये सलग 17 मालिका जिंकत विक्रम आणखी घट्ट रोवला आहे. या यादीत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारताच्या आसपास कोणताच संघ नाही. भारताशिवाय कोणत्याच संघाल घरच्या मैदानावर सलग 10 मालिका जिंकता आल्या नाहीत.

भारताने 2019 पासून आतापर्यंत घरच्या मैदानावर 17 टी20 मालिका जिंकल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाने 2006 ते 2010 दरम्यान घरच्या मैदानावर 8 टी20 मालिका जिंकल्या आहेत. दक्षिण अफ्रिकेने 2007 ते 2010 दरम्यान 7 मालिका जिंकल्या आहेत.

भारताने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेला कधीच मागे टाकलं आहे. त्यामुळे भारताचा हा विक्रम मोडीत काढणं खूपच कठीण दिसत आहे. टी20 क्रिकेटच्या इतिहासात मायदेशात 15 हून अधिक मालिका जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय)