
गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमध्ये सामना होत आहे. चेन्नईचं होम ग्राउंड असल्याने चेन्नईला फायदा होणार आहे. असंच काहीसं आयोजन इतर सामन्यांचं आहे.

बीसीसीआयने महत्त्वाचे सामने चेन्नईच्या एमए चिदंबरम आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. घराच्या मैदानावर सामने आयोजित करणं कितपत योग्य असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

सीएसकेने साखळी फेरीतील सात सामने या मैदानावर खेळले आहेत. क्वॉलिफायर सामनाही याच मैदानावर सुरु आहे. त्यामुळे सीएसकेला त्याचा अधिक फायदा होईल.

गुजरात टायटन्स संघालाही स्टेडियम निवडीचा फायदा होणार आहे. कारण पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झालेला संघ दुसरा क्वालिफायर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणार आहे.

जर गुजरात टायटन्स संघ सीएसके विरुद्ध हरला तर पुढील सामना ते त्यांच्या घरच्या मैदानावर खेळतील. याचा अर्थ पहिला क्वालिफायर खेळणाऱ्या दोन संघांना घरच्या मैदानाचा पाठिंबा मिळणार आहे.

मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर एलिमिनेटर सामना होणार आहे. दोन मैदानांवर 4 सामने आयोजित करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर क्रिकेटप्रेमींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आयपीएलमध्ये दहा संघ स्पर्धा करत आहेत. म्हणजेच ही स्पर्धा दहा मैदानांवर झाली. त्यामुळे प्लेऑफचे सामने तटस्थ मैदानावर आयोजित करण्याची बीसीसीआयला चांगली संधी होती. मात्र, दोन्ही संघांच्या बाजूने मैदानाची निवड करण्यात आल्याने वादाचे कारण ठरलं आहे.