
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्मा नसल्याने कर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर आहे.

बुमराहाने यापूर्वी एकदाच कसोटी संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे. मात्र त्या सामन्यातही संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. दरम्यान, या मालिकेत बुमराहकडे एक विक्रम मोडण्याची संधी आहे. माजी कर्णधार कपिल देवचा विक्रम त्याच्या दृष्टीक्षेपात आहे.

कपिल देव ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे. मात्र काही दिवसात हा विक्रम जसप्रीत बुमराहाच्या नावावर होऊ शकतो. कारण जसप्रीत बुमराह हा विक्रम मोडण्याच्या अवघ्या काही पावलांवर येऊन उभा ठाकला आहे.

कपिल देव कसोटी कारकिर्दित ऑस्ट्रेलियात 11 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 51 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात फक्त 7 सामने खेळला असून 32 विकेट घेतल्या आहेत.

जसप्रीत बुमराहने पाच सामन्यांच्या 10 डावात 20 विकेट घेतल्या की हा विक्रम त्याच्या नावावर होईल. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या या वेगवान गोलंदाजीला पूरक असतात. त्यामुळे त्याला हे आव्हान गाठणं अवघड जाणार नाही.

ऑस्ट्रेलियात कपिल देवने 51, अनिल कुंबळेने 49, आर अश्विनने 39 विकेट घेतल्या आहेत.बिशनसिंह बेदीने 35, तर जसप्रीत बुमराह 32 विकेटसह पाचव्या स्थानावर आहे.