Photo: ऐकावे ते नवलच: महावितरणचे कर्मचारी समोर असताना शॉर्टसर्किटने ऊसाच्या फडाला आग
इगतपुरी : दिवसेंदिवस ऊसाला आग लागल्याच्या घटना घडत आहे. यामध्ये सर्वाधिक घटना ह्या शॉर्टसर्किटमुळे झाल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धामणगांव येथे तर महावितरणचे कर्मचारी हे लाईन पेट्रोलिंग करीत असतानाच झालेल्या शॉर्टसर्किटमध्ये 4 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे सुविधांपेक्षा महावितरणकडून कशा अडचणी निर्माण होत आहे याचे उत्तम उदाहरण धानणगाव शिवारात पाहवयास मिळाले आहे. या दुर्घटनेत काशिनाथ बहिरू गाढवे व रामकृष्ण बहिरू गाढवे यांच्या गट नंबर 428 मधील ऊस जळून खाक झाला आहे.

तोडणी आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी : ऐन तोडणीला आलेल्या ऊसालाच आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.आता ऊसाचे पाचरट हे वाळलेले असते त्यामुळे आग लवकर पसरते. यामध्ये शेतकऱ्यांचे मात्र, अतोनात नुकसान होत आहे. आता तोडणी होणार तेवढ्यात काशिनाथ गाढवे यांच्या 4 एकरातील ऊसाची राख-रांगोळी झाली आहे.

महावितरणचे कर्मचारी फडातच: विद्युत पुरवठा सुऱळीच व्हावा शिवाय विद्युत वाहिन्यांमुळे शेती पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून वीज मंडळाचे कर्मचारी लाईन पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान लाईन फॉल्टी झाल्याने शॉर्टसर्किटची घटना झाली. त्यामुळे महावितरणच्या कारभारामुळे सुविधांपेक्षा अडचणीच अधिक झाल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे. आता त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

ग्रामस्थांचे प्रयत्नही निष्फळ: सिन्नर हायवे लगतच गाढवे यांच्या ऊसाचा फड आहे. आगीची घटना निदर्शनास येताच मार्गस्त होणाऱ्या नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, वाढते ऊन आणि वाऱ्यामुळे अवघ्या काही वेळातच 4 एकरातील फडातील ऊस आगीने कवेत घेतला होता.

भरपाईची मागणी : ही घटना महावितरण कर्मचाऱ्यांच्या समोरच झाली आहे. त्यामुळे कोणतिही औपचारिकता न करता मदत करण्याची मागणी काशिनाथ गाढवे यांनी केली आहे. ऊसासह इतर शेती साहित्याचेही नुकसान झाले आहे.