
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज मंत्रालयात अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे अनेक आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आजचा दिवस राज्याच्या राजकारणात अत्यंत ऐतिहासिक आणि भावूक ठरला.

हा पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी मुंबईतील महत्त्वाच्या श्रद्धास्थानांचे दर्शन घेतले. सकाळी त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

यानंतर विधानभवन परिसरात आल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले. यानंतर सकाळी ११ च्या सुमारास सुनेत्रा पवार या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात दाखल झाल्या.

दालनात प्रवेश करताच सुनेत्रा पवार यांनी प्रथम खुर्चीला आणि त्यानंतर टेबलाला हात जोडून नमस्कार केला. आपल्या पतीच्या रिक्त झालेल्या जागी कार्यभार स्वीकारताना सुनेत्रा पवार काहीशा भावूक झाल्या होत्या.

हे दृश्य पाहून त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना अश्रू अनावर झाले. आईला या जबाबदारीच्या भूमिकेत पाहून पार्थ पवार यांना रडू कोसळल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही काही काळ शांतता पसरली होती.

मंत्रालयात जाण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यालयात छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, अदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील आणि नवाब मलिक यांच्यासोबत त्यांनी प्राथमिक बैठक घेऊन आगामी रणनीतीवर चर्चा केली.

पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार आज त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या विकासकामांना गती देणे आणि सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावणे, हे आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी सूचित केले.