TMKOC : ‘तारक मेहता..’मध्ये आता दिसणार नाही जेठालाल ? निर्मात्यांनी खरं काय ते सांगून टाकलं
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या बहुचर्चित, लोकप्रिय मालिकेतील 'जेठालाल' हे पात्र खूप फेमस आहे. मात्र मालिकेला अनेक वर्ष झाल्यावर जेठालालची आता शो मधून गच्छंती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता मेकर्सनी मौन सोडत मोठा खुलासा केलाया.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या 18 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेच्या सुरुवातीपासूनच अनेक पात्रे शोशी जोडलेली आहेत. दिलीप जोशी हे त्यापैकीच एक मोठं नाव असून, ते यात 'जेठालाल'ची भूमिका साकारतात. जेठालालच्या भमिकेमुळे ते घराघरात आणि प्रेक्षकांच्या हृदयात पोहोचले. मात्र गेल्या काही काळापासून, 'जेठालाल'चे पात्र मालिकेतून काढून टाकले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. या बातमीमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कारण दिलीप जोशी ही मालिका सोडणार आहेत असाच सर्वांचा समज झाला होता.

तारक मेहतामधील, दयाबेन हिच्यानंतर, आता दिलीप जोशी अर्थात जेठालाल, हे जाणार असं ऐकून चाहते चिंतीत झाले, त्यांना तर हा शोच संपल्यासारखं वाटलं होतं. जेठालाल यांच्याबद्दलच्या बातम्यांमुळे तुम्हालाही चिंता वाटली असेल, तर काळजी करू नका कारण आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

सोशल मीडियावर जेठालालच्या पात्राबाबत पसरलेल्या बातम्या चुकीच्या आहेत, असं खुद्द तारक मेहताच्या निर्मात्यांनी सांगितलं. जेठालालचे पात्र मालिकेतून काढून टाकले जाणार नाही किंवा त्याची भूमिकाही कमी केली जाणार नाही, असं प्रसारमाध्यमांशी बोलताना मालिकेच्या निर्मात्यांनी स्पष्ट केलं. एवढंच नव्हे तर मालिकेची कथा अजूनही जेठाभाईंच्याच भोवती फिरते, असं त्यांनी नमूद केलं.

या शोचा एक नवीन प्रोमो देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. 28 जुलै रोजी आम्ही या शोचा 18 वा वर्धापन दिन साजरा करणार आहोत. जेठालाल हे पात्र या शोचा भाग आहे आणि यापुढेही राहील; त्याला मालिकेतून वगळलं जाणार नाही. याचाच अर्थ असा की, जेठालाल या पात्राबाबतचे येणाऱ्या सर्व बातम्या चुकीच्या , खोट्या आहेत. हे ऐकून चाहत्यांचा जीव नक्कीच भांड्यात पडला असेल.

अभिनेते दिलीप जोशी गेल्या 18 वर्षांपासून या शोशी जोडलेले आहेत. त्यांच्या 'जेठालाल' या पात्राला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळाले आहे. दिलीप जोशी यांनी हे पात्र इतक्या उत्साहाने साकारलंय की, लोक त्यांना त्या पात्राच्या नावानेच ओळखतात. मिळालेल्या माहितीनुसार, ते या शोमधील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत. दिलीप जोशी यांचे शोचे निर्माते असित मोदी यांच्याशीही चांगले संबंध आहेत. त्यांच्यात घनिष्ठ मैत्री आहे, जी अनेकदा शोच्या विविध कार्यक्रमांमध्ये आणि उत्सवांदरम्यान दिसून आली आहे.

त्यामुळे चाहत्यांनो, काळजी करू नका आणि सोशल मीडियावर जेठालाल यांच्याबद्दल पसरणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करा. तुमचा लाडका जेठालाल कुठेही जाणार नाही, असं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे. ते कालही शोचा भाग होते, आजही आहेत आणि जोपर्यंत 'तारक मेहता' सुरू राहील, तोपर्यंत ते त्यात कायम राहतील. 'तारक मेहता' पाहत राहा आणि लाडक्या जेठालालवर असेच प्रेम करत राहा.