आपलेच शब्द आपल्यावर उलटणार असतील तर..; तेजश्री प्रधानचं रोखठोक मत
नात्यात बोलणं किती महत्त्वाचं असतं आणि कधीकधी मौन बाळगणंही किती गरजेचं ठरतं, याविषयी अभिनेत्री तेजश्री प्रधान मोकळेपणे व्यक्त झाली आहे. तर अभिनेता सुबोध भावेनंही त्याचं मत मोकळेपणे मांडलं आहे.

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत स्वानंदीची भूमिका साकारत असलेली लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'व्यक्त होण्याविषयी' तिचं मत मांडलं आहे. बोलून मोकळं व्हावं, गप्प राहू नये, असं अनेकदा म्हटलं जातं, यावर तुझं काय मत आहे, असा प्रश्न तेजश्रीला या मुलाखतीत विचारण्यात आला होता.

या प्रश्नाचं उत्तर देताना तेजश्री म्हणाली, "समोरची व्यक्ती कशी आहे, त्यावर हे सगळं अवलंबून आहे. जिथे बोलून शब्द वाया जाणार असतील, तर अशा ठिकाणी मौन बाळगणंच हुशारीचं असतं. पण हे आपल्याला आधी कळावं लागतं. तरच आपण तसं ठरवू शकतो. खरंतर मी रोखठोक बोलणारी आहे. त्यामुळे जिथे मला आवश्यक वाटतं, तिथे मी आवर्जून बोलते."

"रोखठोक बोलतानाही आपण कुठे थांबायचं, हे आपल्याला समजलं पाहिजे. आपले शब्दच जर आपल्यावर उलटणार असतील, असं वाटत असेल तर तिथे थांबलेलंच बरं", असं मत तेजश्रीने मांडलं. याच मुलाखतीत अभिनेता सुबोध भावेलाही प्रश्न विचारण्यात आला. "गप्प राहिल्याने प्रश्न सुटतात असं वाटतं का", असं त्याला विचारलं गेलं.

सुबोध भावे त्यावर म्हणाला, "कधीकधी बोलणं आणि कधीकधी शांत राहणं योग्य असतं. कारण सतत बोलल्याने तुमच्या शब्दांची किंमत कमी होते. अशा वेळी मौन महत्त्वाचा असतो. अर्थात जिथे आवर्जून बोलावंसं वाटत असेल, तर तेव्हा नक्की बोलावं."

अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे हे सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत एकत्र काम करत आहेत. ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि त्यातील या दोघांमधील केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. स्वानंदी आणि समर या जोडीवर प्रेक्षकांकडून भरभरून प्रेमाचा वर्षाव होत आहे.