
सध्या इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ माजली आहे. युद्धाच्या सावटाखाली खनिज तेल आणि गॅस वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेली 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) बंद झाली आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.

याचा थेट फटका भारताला बसण्याची शक्यता असून, देशात एलपीजी (LPG) आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा खंडित होण्याची भीती वर्तवली जात आहे. सध्या अनेक शहरांमध्ये गॅस सिलेंडरची टंचाई भासत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत गॅसचा मर्यादित आणि योग्य वापर करणे हाच एकमेव पर्याय उरला आहे.

आपल्या दैनंदिन सवयींमध्ये थोडे बदल करून आपण सिलेंडर जास्त दिवस कसा टिकवू शकतो, याच्या काही खास टीप्स आपण जाणून घेणार आहोत. अनेकदा आपण भांडे धुतल्यानंतर ते ओले असतानाच गॅसवर ठेवतो. भांड्यातील पाणी सुकवण्यासाठी गॅसची अतिरिक्त ऊर्जा खर्च होते. त्यामुळे भांडे नेहमी पुसून कोरडे करून मगच गॅस पेटवावा.

उघड्या भांड्यात स्वयंपाक केल्यास उष्णता बाहेर निघून जाते आणि अन्न शिजायला वेळ लागतो. भांड्यावर झाकण ठेवल्यास वाफेमुळे अन्न लवकर शिजते आणि गॅसची सुमारे २० टक्के ते २५ टक्के बचत होते.

डाळी, भात किंवा भाज्या शिजवण्यासाठी प्रेशर कुकर हा सर्वात उत्तम पर्याय आहे. साध्या भांड्याच्या तुलनेत कुकरमध्ये अन्न वेगाने शिजते, ज्यामुळे वेळेसोबतच गॅसचीही बचत होते.

गॅस पेटवल्यानंतर फोडणीचे साहित्य शोधणे किंवा भाज्या चिरणे टाळा. गॅस जवळ जाण्यापूर्वी भाज्या चिरणे, मसाला तयार करणे ही तयारी पूर्ण करुन ठेवला. ही तयारी झाल्यानंतर गॅस पेटवा.

गॅस वापरताना त्याची फ्लेम कमी ठेवा. मोठी फ्लेम भांड्याच्या बाहेर जाते, ज्यामुळे उष्णता वाया जाते. नेहमी मध्यम किंवा मंद आचेवर स्वयंपाक करावा, यामुळे अन्न नीट शिजते आणि गॅस वाया जात नाही.

जर गॅसची ज्योत निळी न दिसता पिवळी किंवा लाल दिसत असेल, तर समजावे की बर्नरमध्ये कचरा अडकला आहे. नियमितपणे बर्नर साफ केल्याने गॅसचा प्रवाह सुरळीत राहतो.