ही निवडणूक फक्त धनदांडग्यांची, पैशांशिवाय… शिंदे गटाच्या आमदाराकडून पोलखोल
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी महायुतीवर थेट निशाणा साधला आहे. "कोळशाच्या दलालीत हात काळे करायचे नाहीत" असं म्हणत त्यांनी निवडणुकीतून दूर राहण्याचा निर्णय घेतला असून नांदेडच्या राजकारणातील मोठ्या आर्थिक व्यवहारांवर खळबळजनक आरोप केले आहेत.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच नांदेडमधील शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी महायुतीला थेट आव्हान देत या निवडणुकीतून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. “कोळशाच्या दलालीत मला माझे हात काळे करायचे नाहीत,” अशा अत्यंत शब्दांत त्यांनी सध्याच्या निवडणुकीतील अर्थकारणावर आणि बदलत्या समीकरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
आमदार हेमंत पाटील यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले. यावेळी त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत तुम्ही महायुतीसोबत का दिसत नाही? असा सवाल करण्यात आला. त्यावर हेमंत पाटील म्हणाले, “मी मुद्दाम या निवडणुकीच्या बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्दैवाने आताची निवडणूक ही मराठी माणसाची राहिलेली नसून, ती फक्त धनदांडग्यांची निवडणूक झाली आहे. आपण कुणाला काही सांगितले तरी त्याने फरक पडणार नाही, कारण सर्वजण पैसे घेतल्याशिवाय मतदान करणार नाहीत अशी परिस्थिती आहे.
सगळीकडे मोठा बाजार
सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचा पार तमाशा झाला आहे. ही एक प्रकारे अगतिकता असून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. सध्या सगळीकडे मोठा बाजार सुरू झाला आहे, असा घणाघात हेमंत पाटील यांनी केला.
यावेळी त्यांना नांदेडमधील पारंपरिक राजकीय शत्रू असलेले अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर यांच्यातील कथित दिलजमाईवर विचारण्यात आले असता ते म्हणाले, “आजच्या घडीला कोणाबरोबर बसावं आणि कोणावर विश्वास ठेवावा, हेच मोठे प्रश्नचिन्ह आहे. आज जो माणूस आमच्यासोबत बसलाय, तो उद्या कुणासोबत असेल हे कोणीही सांगू शकत नाही. ज्यांच्यासोबत आज आम्ही बसलोय, ते उद्या विरोधी तंबूत दिसतात. महाराष्ट्रात कोणाची कुणासोबत आघाडी किंवा युती होईल, याचा नेम राहिलेला नाही. याच अनिश्चिततेमुळे मी या निवडणुकीपासून लांब आहे.
सर्व शिवसैनिक त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे
शिवसेना या निवडणुकीत महायुतीसोबत आहे की नाही, हा प्रश्न तुम्ही आमच्या जिल्हाप्रमुखांना आणि त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांना विचारा. तेच यावर अधिकृत भूमिका घेत आहेत, असेही हेमंत पाटील यांनी म्हटले. एकनाथ शिंदे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी घेतलेली भूमिका ही नेहमीच राज्याच्या आणि राष्ट्राच्या हिताची असते. आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
नांदेड जिल्ह्यात निवडणुकीत काही फार मोठं घडतंय असं मला वाटत नाही. इथे फक्त उमेदवारी अर्ज दाखल केले जातात आणि नंतर तेच अर्ज मागे (विड्रॉल) घेतले जातात. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पाठीमागे खूप मोठा आर्थिक व्यवहार होतो, आणि हा प्रकार काय आहे हे संपूर्ण नांदेड जिल्ह्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. कृष्णा पाटील आणि अमरनाथ राजूरकर हे मला वाटतं ती पक्षाची अधिकृत उमेदवारी नाही, त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. अजून तरी त्यांचा कोणताही संपर्क किंवा अप्रोच माझ्यापर्यंत आलेला नाही, असे हेमंत पाटील यांनी म्हटले.
