भारतीय रेल्वेचे जन्मस्थान काळाच्या उदरात गडप? या स्टेशनच्या इमारतीवर हातोडा, 153 वर्षांचा इतिहास मिटणार?
आशियातील पहिली प्रवासी ट्रेन बोरीबंदर ( मुंबई ) ते ठाणे या मार्गावर 16 एप्रिल 1853 रोजी धावली होती. या ऐतिहासिक पहिल्या भारतीय रेल्वे मार्गाचे पूजन ( पायाभरणी ) मात्र बोरीबंदरला नव्हे तर एका वेगळ्याच स्थानावर झाली होती. तेथे जनतेच्या मागणीतून एक स्थानक उभे राहिले, त्या स्थानकाच्या स्टेशन इमारतीवर काल शनिवारी १५३ वर्षांनी हातोडा पडला...

आपण त्या काळातील मुंबईतील ब्रिटीशांनी वसवलेल्या मुंबईची हद्द ( वेस ) असलेल्या 'शीव' बद्दल बोलत आहेत. इंग्रजांनी याचे नाव 'सायन' पाडले. बोरीबंदर ते ठाणे रेल्वे १८५३ रोजी सुरु झाली असली तर 'शीव' येथे या रेल्वे गाडीला प्रवासी थांबा नव्हता. येथे केवळ इंजिनांचे देखभाल आणि अदलाबदल होत असे.

शीव गावातील रहिवाशांनी अखेर ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीकडे सन १८७२ - ७३ दरम्यान पिटीशन दाखल करुन स्थानक उभारण्याची मागणी केली. त्यानंतर ३ नोव्हेंबर १८७३ रोजी शीव ( सायन ) स्थानकांचे उद्घाटन झाले. या जुन्या स्टेशन इमारतीचे स्ट्रक्चर आजही उन्हाळे पावसाळे झेलत दिमाखात उभे होते. परंतू आता स्थानक पुनर्विकासात या इमारतीवर शनिवारी पहिला हातोडा पडला.

या शीव स्थानकातील १८७३ मध्ये बांधलेली स्टेशन इमारत काल पाडायला सुरुवात झाली आहे. या इमारतीचे छत आणि भिंत यांना जोडणाऱ्या सांध्यावर लोखंड आणि लाकडी फ्रेममध्ये ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीचे 'GIPR' हे आद्याक्षरे १५३ वर्षांनंतरही अजूनही शाबूत आहेत.

विशेष म्हणजे जीआयपीआर कंपनीचे पहिले कार्यालय आणि बैठका नाना शंकरशेठ यांच्या घरात सुरु झाले होते.प्रवाशांचे लगेज मोजण्याची मशिन, आणि ती तिकीट खिडकी रेल्वेचा इतिहास रेल्वे प्रेमींसाठी जतन केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

रेल्वे अभ्यासक आणि लेखक राजेंद्र आकलेकर यांनी हा जीआयपीआर कंपनीचा वारसा जतन करण्याची मागणी मध्य रेल्वेला केली आहे. मध्य रेल्वे आता लोणावळा येथील त्यांच्या रेल्वे संग्रालयात हे जीआयपीआर काळातील स्थानकाचे साहित्य जतन करणार आहे.