रेल्वेच्या हाय व्होल्टेज वायरवर बसूनही पक्ष्यांना शॉक का लागत नाही? नशीब की विज्ञान, जाणून घ्या
रेल्वेच्या २५,००० व्होल्टच्या हाय व्होल्टेज तारांवर बसूनही पक्ष्यांना विजेचा धक्का का लागत नाही? यामागील रंजक शास्त्रीय कारण आणि सर्किटचा नियम सविस्तर जाणून घ्या.

अनेक रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वे ट्रॅकच्या कडेला असलेल्या ओव्हरहेड वायरमधून तब्बल २५ हजार व्होल्टचा विद्युत प्रवाह वाहत असतो. एवढ्या मोठ्या दाबाच्या विजेचा स्पर्श जरी झाला, तरी माणसाचा कोळसा होऊ शकतो.

मात्र, आपण अनेकदा पाहतो की रेल्वेच्या तारांवर अनेक छोटे पक्षी आरामात बसलेले असतात. त्यांना ना शॉक लागतो, ना कोणतीही इजा होते. यामागचे कारण केवळ नशीब नसून विज्ञानाचा एक महत्त्वाचा नियम आहे.

विजेचा धक्का लागण्यासाठी 'सर्किट' पूर्ण होणे आवश्यक असते. जेव्हा वीज एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे प्रवाहित होते, तेव्हाच शॉक बसतो. पक्षी जेव्हा रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर बसतात, तेव्हा त्यांचे दोन्ही पाय एकाच वायरवर असतात. यामुळे 'पोटॅन्शिअल डिफरन्स' (Potential Difference) तयार होत नाही.

वीज नेहमी सोपा मार्ग शोधते; पक्ष्याच्या शरीराचा रोध (Resistance) वायरपेक्षा जास्त असल्याने, वीज पक्ष्याच्या शरीरात न शिरता सरळ वायरमधून पुढे निघून जाते. विजेच्या प्रवाहाचा स्वभाव असा असतो की तो नेहमी जमिनीकडे (Earth) जाण्याचा प्रयत्न करतो.

जेव्हा एखादा माणूस जमिनीवर उभा राहून तारेला स्पर्श करतो, तेव्हा वीज त्याच्या शरीरातून जमिनीकडे प्रवाहित होते आणि त्याला जोरदार धक्का बसतो. मात्र, पक्षी हवेत असलेल्या वायरवर बसलेले असतात. त्यांचा जमिनीशी किंवा खांबाशी कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संपर्क नसतो. जोपर्यंत सर्किट 'ग्राउंड' होत नाही, तोपर्यंत पक्षी सुरक्षित राहतात.

असं नाही की पक्ष्यांना कधीच शॉक लागत नाही. जर एखाद्या मोठ्या पक्ष्याने (घार किंवा गिधाड) एकाच वेळी दोन वेगवेगळ्या तारांना स्पर्श केला किंवा एका तारेवर बसून दुसऱ्या अर्थिंग असलेल्या खांबाला स्पर्श केला, तर सर्किट पूर्ण होते. अशा स्थितीत वीज पक्ष्याच्या शरीरातून प्रवाहित होते आणि त्याचा मृत्यू होतो.

रेल्वेच्या ओव्हरहेड तारांमध्ये दोन तारांमधील अंतर जास्त ठेवण्यामागे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. पक्ष्यांची शरीररचना आणि बसण्याची पद्धत त्यांना वाचवते, पण मानवासाठी हे अत्यंत धोकादायक आहे.

रेल्वेच्या ओव्हरहेड वायरपासून ठराविक अंतर राखणे आवश्यक आहे, कारण इतक्या हाय व्होल्टेजमध्ये वीज हवेतूनही खेचली जाऊ शकते (Arcing). त्यामुळे रेल्वे रुळांजवळ पतंग उडवणे किंवा लोखंडी सळ्या नेणे जिवावर बेतू शकते.