
दूध गरम करताना ते उतू जाणं ही आपल्या सगळ्यांच्या घरातली एक साधारण गोष्ट आहे. पण जर हे तुमच्या घरात वारंवार होत असेल तर यामागे काहीतरी मोठं दडलं आहे? असं मानलं जात आहे.

दूध उतू जाण्याला अनेकजण याला शुभ किंवा अशुभ घटनांचे संकेत मानतात. तर काही जण याचा संबंध तुमच्या नशिबाचे संकेत आणि घरातील शांततेसोबतही जोडतात. पण या घटनेचा नेमका अर्थ काय होतो, याबद्दल आपण जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रानुसार, दुधाचा संबंध थेट चंद्र ग्रहाशी आहे. त्यामुळे दूध उतू जाण्याला केवळ एक अपघात मानलं जात नाही. जेव्हा दूध वारंवार उतू जातं, तेव्हा ते घरात अशुभ घटना घडणार असं मानलं जातं.

वारंवार दूध उतू जात असेल त्या घरात आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच या कुटुंबात सततचे वाद-विवाद, तणाव वाढू शकतो. दूध हे चंद्राचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे दूध उतू गेल्यास चंद्र दोष लागतो.

त्याचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, असेही म्हटले जाते. पण जेव्हा तुम्ही नवीन घरात गृहप्रवेश करत असाल, त्यावेळी दूध उतू गेलं, तर ते अत्यंत शुभ मानलं जातं.

हे घरात सुख, समृद्धी आणि भरभराट येणार असल्याचं लक्षण मानलं जाते. तसेच, जर तुमच्याकडून चुकून एकदाच दूध उतू गेलं, तर ते अचानक धनलाभ किंवा एखादी चांगली बातमी मिळण्याचे संकेत असू शकतात.

मात्र, हे वारंवार घडल्यास ते अशुभ मानले जाते. दूध उतू जाण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. दूध हे पाणी, फॅट आणि प्रोटीनचं मिश्रण आहे. जेव्हा तुम्ही दूध तापवता, तेव्हा पाणी वाफेच्या रूपात बाहेर पडू लागतं.

पण, दुधातील फॅट आणि प्रोटीनमुळे भांड्याच्या तोंडाशी एक जाड थर तयार होतो. हा थर वाफेला बाहेर पडू देत नाही, त्यामुळे आतमध्ये वाफेचा दाब वाढतो. याच दाबामुळे दूध फेस येऊन भांड्यातून बाहेर येतं.

पाण्याला कधीही फेस येत नाही, कारण त्यात असे घटक नसतात. त्यामुळे पुढच्या वेळी दूध उतू गेलं, तर या बाबींचा नक्की विचार करा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)