
भंडाराच्या त्रिमूर्ती चौक येथे गोसेखुर्द धरण बाधितांनी दोन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आंदोलकांनी आज आक्रमक भूमिका घेतली.

गोसेखुर्द धरण बाधितांच्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने त्यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कडुलिंबाच्या मोठ्या झाडावर चढून अनोखे आंदोलन केले.

या आंदोलकांना नायब तहसीलदारांनी भेट दिली, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी भेट द्यावी आणि शब्द द्यावा अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

सायंकाळी अंधार पडूनही महिला झाडावर आहेत.तीन तासांहून अधिक काळ महिला झाडावर असल्याने त्या अगदी थकून गेल्याचे पाहायला मिळत आहेत.

जिल्हाधिकारी जर आंदोलन स्थळी येऊ शकत नसतील तर त्यांनी किमान व्हिडिओ कॉन्फरन्सवरुन शब्द द्यावा! अशी मागणी आंदोलक महिलांनी केली आहे.

मात्र प्रशासनाचे अधिकारी महिला आंदोलक थकून स्वतः खाली उतरण्याची वाट पहात आहे!! या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

झाडावर चढलेल्या महिलांना कोणतीही इजा होऊ नये म्हणून खाली त्यांच्या सेफ्टीसाठी जाळी देखील लावण्यात आलेली आहे. फायर ब्रिगेडच्या सिडीच्या सहाय्याने त्यांना उतरवण्यासाठी काही वेळात प्रयत्न केले जाणार आहेत.