माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीविरोधात ईडीचा मोठा दावा, 100 कोटी दिले, केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यासोबत रचला कट,

दिल्ली सरकारने दारू धोरण तयार करण्यासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये फायदा मिळवण्यासाठी दिल्लीतील प्रमुख नेत्यांसोबत कट रचला होता. यासाठी केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना 100 कोटी रुपयेही दिले असा दावा ईडीने केला आहे.

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीविरोधात ईडीचा मोठा दावा, 100 कोटी दिले, केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यासोबत रचला कट,
k, kavita
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Mar 18, 2024 | 10:16 PM

नवी दिल्ली | 18 मार्च 2024 : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात अडकलेल्या बीआरएसच्या नेत्या कविता यांच्याबाबत अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) मोठा दावा केला आहे. के. कविता यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत मद्य धोरणात फायदा मिळवण्यासाठी कट रचला होता. त्या बदल्यात त्यांना 100 कोटी रुपये दिले होते असे म्हटले आहे. कविता यांच्या अटकेनंतर ईडीने या प्रकरणाबाबत एक निवेदन जारी केले आहे.

बीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव यांची मुलगी के कविता आणि इतरांनी दिल्लीतील मद्य धोरण तयार करण्यासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये फायदा मिळवण्यासाठी दिल्लीतील प्रमुख नेत्यांसोबत कट रचला होता. यामध्ये अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचाही समावेश होता. या लाभाच्या बदल्यात 100 कोटी रुपये देण्यातही के कविता यांचा सहभाग होता असा आरोप ईडीने केला आहे. के कविता आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आम आदमी पार्टीला मद्य धोरणाच्या फायद्यातून दिलेली रक्कम वसूल करायची होती आणि नफाही मिळवायचा होता असेही ईडीने म्हटले आहे.

15 मार्च रोजी के. कविता यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानावर छापा टाकण्यात आला. के. कविता यांच्या नातेवाईकांनी या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर त्याला अटक करून नवी दिल्लीतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाल्याने त्यांना 7 दिवसांची कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 1 फिर्यादी तक्रार आणि 5 पूरक तक्रारी दाखल केल्या आहेत. याशिवाय, गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेपैकी आतापर्यंत 128.79 कोटी रुपयांचा मुद्देमाल उघडकीस आला आहे असे ईडीने निवेदनात म्हटले आहे.

केजरीवाल यांना आतापर्यंत 9 समन्स

या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सतत चौकशी करण्याचा प्रयत्न ईडी करत आहे. त्यांना आतापर्यंत 9 समन्स पाठवले आहेत. मात्र, केजरीवाल यांनी या समन्सकडे दुर्लक्ष केले आहे. आम आदमी पार्टीने या प्रकरणात न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. तरीही ईडी त्यांना वारंवार समन्स का पाठवत आहे असा सवाल केला आहे.

245 ठिकाणी छापे, 15 जणांना अटक

दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने आतापर्यंत दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, मुंबई आणि इतर ठिकाणांसह देशभरात 245 ठिकाणी छापे टाकले आहेत. तर, आपचे मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि विजय नायर यांच्यासह 15 जणांना अटक करण्यात आली आहे.