निम्मे मतदान झालंय, आमची अंतर्गत माहिती, भाजप हरतंय : राहुल गांधी

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

नवी दिल्ली : अर्ध्यापेक्षा जास्त मतदान पार पडलंय, आमच्या अंतर्गत माहितीनुसार भाजपचा पराभव होत आहे, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. राजधानी दिल्लीत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. मोदींनी देशाला सांगितलं होतं की वर्षाला 2 कोटी रोजगार देऊ, मात्र आज सर्वात जास्त बेरोजगारी आहे, असं राहुल गांधी म्हणाले. Rahul […]

निम्मे मतदान झालंय, आमची अंतर्गत माहिती, भाजप हरतंय : राहुल गांधी
Follow us on

नवी दिल्ली : अर्ध्यापेक्षा जास्त मतदान पार पडलंय, आमच्या अंतर्गत माहितीनुसार भाजपचा पराभव होत आहे, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. राजधानी दिल्लीत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. मोदींनी देशाला सांगितलं होतं की वर्षाला 2 कोटी रोजगार देऊ, मात्र आज सर्वात जास्त बेरोजगारी आहे, असं राहुल गांधी म्हणाले.


भाजपची खोटी आश्वासने, नरेंद्र मोदींचा भ्रष्टाचार, बेरोजगारी यामुळे भाजपचा पराभव निश्चित, आज कुठेही केवळ चौकीदार म्हणा, आपोआप चोर है जोडलं जाईल, असा टोमणा राहुल गांधींनी लगावला.

काँग्रेसच्या काळातील सर्जिकल स्ट्राईकचे पंतप्रधान मोदी पुरावे मागत असतील, तर ते भारतीय सैन्याचा अपमान करत आहेत. आमच्या काळात सर्जिकल स्ट्राईक हे काँग्रेसने केले नाहीत, आर्मीने केले, मात्र सध्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे मोदी स्वत:ची प्रॉपर्टी मानत आहेत, असं टीकास्त्र राहुल गांधींनी सोडलं.


मोदींनी भारतीय अर्थव्यवस्थेला गंभीररित्या डॅमेज केलंय, मग ते नोटाबंदीमुळे असो वा गब्बर सिंग टॅक्स (GST) असो, असं राहुल गांधी म्हणाले.

मी मोदींसारखं दोन कोटींचं आश्वासन देणार नाही, मात्र वर्षाकाठी 22 लाख तरुणांना सरकारी नोकरी मिळेल, याची खात्री देतो. न्याय व्यवस्थेतून गरिबांना 72 हजार रुपये मिळतील, त्यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असं राहुल यांनी नमूद केलं.

सरकारी संस्थांना वाचवणं, हे आमचं पहिलं ध्येयं

मोदी म्हणतात, मी देशाच्या सुरक्षेसाठी काम करतोय, अरे भाई, आपलं सैन्य 70 वर्षांपासून चांगलं काम करतेय. राफेल करारातून चौकीदाराने 30 हजार कोटींची चोरी केली. मोदी आणि भाजपला पराभूत करुन, भारतातील सरकारी संस्थांना वाचवणं, हे आमचं पहिलं ध्येयं आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

भारतासमोर आर्थिक संकट आहे, मात्र मोदी हे स्वीकारतच नाहीत, असा दावा त्यांनी केला.

दहशतवादी मसूद अझहरला भाजपने पाकिस्तानात सोडलं, काँग्रेस असे कधीच करणार नाही. मसूद अझहर हा दहशतवादी आहे, त्याच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी, असं राहुल गांधींनी नमूद केलं.

अनिल अंबानींचं घर सोडून कुठेही चर्चेस तयार

निवडणूक आयोग पूर्णपणे एकांगी आहे. मोदींच्या चेहऱ्यावर पराभव दिसत आहे. मोदींनी मी आव्हान देतो, त्यांनी खुल्या व्यासपीठावर माझ्याशी चर्चा करावी. कुठेही चर्चा करायला मी तयार आहे. अनिल अंबानींचं घर सोडून कुठेही चर्चा करण्यास तयार आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

मोदींना 5 वर्षात संपवून टाकले. आता फक्त बुरुज आहे तो 23 मे रोजी लोकसभा निकालावेळी पडून जाईल, असा दावा राहुल गांधींनी केला.

मोदींनी देशाची शान संपवून टाकली आहे.देशातील शांतता मोदींनी संपवली. त्यांनी पाच वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. दबाव आला की पंतप्रधान पळून जातात, असा त्यांचा स्वभाव आहे. मोदींनी जनतेचे पैसे घेतले, मात्र आम्ही जनतेला पैसे देऊ, असं राहुल गांधी म्हणाले.

देशाचे लोक जे ठरवतील, तो पंतप्रधान मला मान्य असेल, मात्र सध्या माझं काम देशाच्या संस्थांना वाचवणं हे आहे, असं त्यांनी नमूद केलं.