आठवड्यात नुकसान भरपाईबाबत निर्णय घेणार, मदतीसाठी डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना अजितदादांचा शब्द

| Updated on: Oct 01, 2021 | 3:11 PM

राज्यात लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. हजारो हेक्टर शेती अजूनही पाण्याखाली आहे. सोयाबीन, कपाशीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या सगळ्यानंतर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरकारच्या मदतीकडे डोळे लागले आहेत.

आठवड्यात नुकसान भरपाईबाबत निर्णय घेणार, मदतीसाठी डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना अजितदादांचा शब्द
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us on

पुणे : गेल्या आठवड्यात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, आदी भागांत पावसाने दाणादाण उडवली. यामध्ये बळीराजाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. चिंताग्रस्त बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या कॅबीनेटमध्ये नुकसानग्रस्तांच्या मदतीबाबत निर्णय घेतला जाईल, असा शब्द शेतकऱ्यांंना दिला आहे.

अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. हजारो हेक्टर शेती अजूनही पाण्याखाली आहे. सोयाबीन, कपाशीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या सगळ्यानंतर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरकारच्या मदतीकडे डोळे लागले आहेत. याच शेतकऱ्यांना पुढच्या आठवड्यात मदतीचा शब्द अजितदादांनी दिला आहे.

येत्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ

शेतकऱ्यांसाठी काही पॅकेज जाहीर करणार आहात का? शासनस्तरावर काय मदत केली जाणार आहे?, असे पत्र यावेळी पत्रकारांनी विचारले. त्यावर येत्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल, हे पाहिलं जाईल, असं अजित पवार म्हणाले.

विमा कंपन्यांना सूचना केल्यात

राज्यात गेल्या आठवड्यात तुफान पाऊस पडला. मोठा भाग पूरग्रस्त बनला. अनेक ठिकाणी पावसाचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळाला. बळीराजाचं मोठं नुकसान झालंय. आता विमा कंपन्यांना सूचना दिलेल्या आहेत. लवकरात लवकर शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली पाहिजे, अशा सूचना दिलेल्या आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं.

मंत्र्यांनी बांधावर जाऊन पाहणी दौरा केला, विरोधकांचे आरोप खोटे

शेतकरी संकटात असताना राष्ट्रवादीचे मंत्री संवाद यात्रेत फिरत होते. त्यांना शेतकऱ्यांचा अजिबात कळवळा नाही. त्यांना पक्ष, सत्ता महत्त्वाची आहे, अशी टीका विरोधी पक्षाकडून केली गेली. विरोधी पक्षाच्या आरोपांना देखील अजित पवारांनी उत्तर दिलं.

पाऊस पडत होता तेव्हा मंञी मराठवाड्यातच होते. मंत्री लगोलग शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. विरोधकांचे आरोप बरोबर नाहीत. विरोधकांचा आरोप खोटा आहे की मंञी फिरकले नाहीत. संबंधित मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केल्याचं अजित पवार म्हणाले.

नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या अनेक भागांत सध्या महापूर, अतिवृष्टीने हाहाकार उडवला आहे. मराठवाड्यात तर ‘पाणीच पाणी चहूकडे’ अशी स्थिती आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी तातडीच्या बैठकीचे आयोजन केलं आहे. 6 ऑक्‍टोबरला मुंबईतील पक्ष कार्यालयात ही बैठक होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला सगळ्या मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिलेले आहेत.

बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

पावसामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक जिल्ह्यातील माहिती पवार या बैठकीत घेणार आहेत. कोणत्या विभागात किती नुकसान झालंय, पंचनामे झालेत का?, मदतीसंदर्भात काय करता येईल, याची चर्चा या बैठकीत होणे अपेक्षित आहे. तसंच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना त्या-त्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात दौरा करण्याच्या सूचना देखील पवार देण्याची शक्यता आहे.

बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार?

या बैठकीला स्वत: शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री छगन भुजबळ, राजेश टोपे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, संजय बनसोडे यांसह इतरही मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, मदतीकडे नजरा

तुफान पावसाने शेती, रस्ते, जनावरे, घरांची पडझड झाली असून पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जात असले तरी मदत लवकर मिळाली तरच खऱ्या अर्थाने त्यांना दिलासा मिळणार आहे. केंद्र व राज्य सरकारने एकमेकांकडे बोट न दाखविता आणि राजकारण, आरोप प्रत्यारोपात वेळ वाया न घालता भरीव मदत करणे गरजेचे आहे.

(A decision will be taken in the cabinet meeting regarding compensation to the farmers Says DCM Ajit Pawar)

हे ही वाचा :

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तातडीची बैठक, शरद पवारांचा निर्णय, अजेंड्यावर ओला दुष्काळ की आघाडीतली धूसफुस?

उस्मानाबादेत 2 दिवसात 278 कोटींचं नुकसान, हिरवीगार शेती उद्धवस्त; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, मदतीकडे नजरा

महाराष्ट्रात संकटांची मालिका, मराठवाडा जलमय, केंद्र सरकारने भरीव निधी द्यावा : संजय राऊत