…ते मराठी लोकही करत नसतील, वादग्रस्त पुस्तकाच्या लेखकाची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Jan 13, 2020 | 1:01 PM

राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत असून अनेक नेत्यांनी यावरुन भाजपवर टीका केली आहे. यानंतर जय भगवान गोयल यांनी 'टीव्ही 9 मराठी'शी केलेल्या बातचीतमध्ये यावर स्पष्टीकरण दिलं.

...ते मराठी लोकही करत नसतील, वादग्रस्त पुस्तकाच्या लेखकाची पहिली प्रतिक्रिया
Follow us on

नवी दिल्ली : भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे काल (12 जानेवारी) प्रकाशन   करण्यात आले. भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार (Jai bhagwan goyal comment Book on Modi) पडला. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत असून अनेक नेत्यांनी यावरुन भाजपवर टीका केली आहे. यानंतर जय भगवान गोयल यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी केलेल्या बातचीतमध्ये यावर स्पष्टीकरण दिलं.

“मी जितका छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करतो, तेवढा सन्मान मराठी लोकही करत नसतील,” असे स्पष्टीकरण ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे लेखक भाजप नेते जय भगवान गोयल यांनी दिले. “जे लोक पुस्तकावर चर्चा करत आहे. त्यांनी एकदा पुस्तक वाचा. त्यांना उत्तर मिळेल. ज्यांना माझ्याविरोधात आरोपपत्र दाखल करायचे आहे. त्यांना सर्व अधिकार आहे,” असेही गोयल यावेळी म्हणाले.

“प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यानुसार मला जे वाटलं ते मी लिहिलं. मी पुस्तक लिहून माझ्या भावना प्रकट केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाजांनीही ते पुस्तक वाचावं. मी त्यात काहीही वादग्रस्त लिहिलेले नाही. मीही शिवाजी महाराजांचा सन्मान करतो,” असेही गोयल (Jai bhagwan goyal comment Book on Modi) म्हणाले.

“जे लोक याचा विरोध करत आहेत त्यांनी पुस्तक वाचावे असे मी सांगतो. कारण जे या गोष्टींचा विरोध करत आहेत त्यांना त्यांचे उत्तर मिळेल, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.

“छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजचं आहेत. त्यांचा पूर्ण सन्मान आहे आणि तो कायम राहील. पूर्ण देश त्यांचा सन्मान करतात. मी लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा चाहता आहे. मी लहानपणीही मी शिवाजी, मी शिवाजी नावाचा खेळ खेळायचो. त्यामुळे लहानपणापासून माझ्या अंगात हिंदूत्वाची भावना माझ्यात आहेत,” असेही जय भगवान गोयल यावेळी म्हणाले.

“जे लोक पुस्तकावर चर्चा करत आहेत. त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी हे पुस्तक वाचावे. जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील,” असेही ते म्हणाले.

“प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. संजय राऊत त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. लोकशाही आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा अधिकार आहे,” असेही ते म्हणाले

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, भाजपकडून पुस्तक प्रदर्शित, सोशल मीडियावर संताप

भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे काल (12 जानेवारी) प्रकाशन करण्यात आले. भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकात मोदींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी हे नेते उपस्थित होते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाजपवर नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यापूर्वी या पुस्तकावर माजी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांना हे मान्य आहे का? असा सवाल केला होता. त्यावरुन संभाजीराजेंनी ट्विट करुन, थेट उद्धव ठाकरेंना संजय राऊतांच्या जिभेला लगाम घालण्याचा सल्ला दिला होता.