कुठेही चिखल करुन कमळ फुलवा, हे होऊ देणार नाही, आदित्य ठाकरेंचा पहिल्याच भाषणात हल्लाबोल

| Updated on: Dec 18, 2019 | 8:10 PM

शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात भाजपवर हल्लाबोल केला (Aditya Thackeray criticize BJP).

कुठेही चिखल करुन कमळ फुलवा, हे होऊ देणार नाही, आदित्य ठाकरेंचा पहिल्याच भाषणात हल्लाबोल
Follow us on

नागपूर : शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात भाजपवर हल्लाबोल केला (Aditya Thackeray criticize BJP). आता कुठेही चिखल करुन कमळ फुलवा, हे होऊ देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी भाजपला दिला. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आदित्य ठाकरेंनी भाजपला अनेक मुद्द्यांवर कोपरखळ्या मारल्या (Aditya Thackeray criticize BJP).

आदित्य ठाकरे म्हणाले, “सत्तेची हावं कशी असते आणि मित्रांना कसं डावललं जातं हेही मी पाहिलं आहे. आमचे आवाज वेगवेगळे असले तरी आमच्यात एकमत आहे एवढं नक्की. यापुढे कुठेही चिखल करुन कमळ फुलवा हा प्रकार होऊ देणार नाही. आता महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भयमुक्त सरकार स्थापन झालं आहे.”

नोटबंदी आणि जीएसटीमुळे अनेक उद्योग बुडाले. मात्र, आमचं सरकार रोजगार निर्मितीसाठी पूर्ण प्रयत्न करेन याचा मला विश्वास आहे. “केजी टू पीजी” शिक्षण बदलले पाहिजे. त्यात नोकरीचीही हमी हवी. डिजिटल एज्युकेशन गावपातळीवर न्यावं लागेल, असंही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.

राज्यपालांचं भाषण लहान असलं तरी त्यात कुठेही जुमला नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच टोमणा मारला. आदित्य ठाकरे म्हणाले, “महाविकासआघाडीचं सरकार हे वचनपूर्ती करणारं सरकार आहे. आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम असला, तरी कॉमन मॅक्सिमम प्रोग्रेस हे ध्येय आहे.”