Navneet Rana : ओवैसींनी चॅलेंज स्वीकारल्यानंतर आता नवनीत राणा यांचं उत्तर, ‘सांगा कुठे यायचं, मी…’ Video
Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. फक्त 15 सेकंद पुरेसे आहेत.15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवा'. त्यांनी ओवैसी बंधुंना चॅलेंज दिलं. ओवैसी बंधुंनी हे आव्हान स्वीकारल्यानंतर आता नवनीत राणा यांनी उत्तर दिलं आहे.
भाजपाच्या स्टार प्रचारक नवनीत राणा सध्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी बुधवारी हैदराबादमध्ये बोलताना थेट ओवैसी बंधुंना आव्हान दिलं. ‘फक्त 15 सेकंद पुरेसे आहेत.15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवा’ असं नवनीत राणा म्हणाल्या. भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा तिथे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. “छोटा म्हणतो पोलिसांना 15 मिनिटासाठी हटवा, मग आम्ही दाखवतो काय करु शकतो ते, छोट्याला माझं एवढच सांगणं आहे की, तुला 15 मिनिट लागतील, पण आम्हाला 15 सेकंद पुरेसे आहेत. 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवलं, तर छोटा (अकबरुद्दीन ओवैसी) आणि मोठा (असदुद्दीन ओवैसी) यांना समजणारच नाही की, ते कुठून आले आणि कुठे गेले” असं नवनीत राणा म्हणाल्या होत्या. असदुद्दीन ओवैसी यांचा धाकटा बंधु अकबरुद्दीन ओवैसी याच्या काही वर्षापूर्वीच्या वक्तव्यावरुन नवनीत राणा यांनी हे आव्हान दिलं.
नवनीत राणा यांचं हे चॅलेंज हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे असदुद्दीन ओवैसी यांनी स्वीकारलं आहे. त्यांनी एक तास मागितला. आज रावेरमध्ये रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी आलेल्या नवनीत राणा यांना या बद्दल विचारण्यात आलं. असदुद्दीन ओवैसी यांनी चॅलेंज स्वीकारलय, तुमचं काय म्हणणं आहे, असा प्रश्न टीव्ही 9 च्या पत्रकाराने त्यांना विचारला. त्यावर नवनीत राणा म्हणाल्या की, “त्यांनी सांगाव काय करायच ते, मी तयार आहे. जसं बोलतील, तसं उत्तर देऊ, मी तयार आहे. माझी तयारी आहे, त्यांनी सांगावं कुठे यायचं. जो जसं बोलणार, तसं त्याला उत्तर मिळणार” महिलेच्या चारित्र्यावर बोलणाऱ्यांबद्दल काय म्हणाल्या?
राजकारणात महिलेच्या चारित्र्यावर बोलणाऱ्यांनाही त्यांनी उत्तर दिलं. “महिलेच्या चारित्र्यावर बोलून त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न होतो. माझं, त्या लोकांना एवढच सांगणं आहे की, महिलेसोबत लढत असताना पातळी घसरणार नाही याची काळजी घ्या. आपण लोकाहितासाठी, देशहितासाठी लढतोय. ही काही जिल्हा परिषदेची निवडणूक नाहीय” असं नवनीत राणा म्हणाल्या.