पक्षविरोधी काम भोवलं, एमआयएमकडून 6 नगरसेवकांची हकालपट्टी

| Updated on: Dec 31, 2019 | 5:55 PM

पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी 6 नगरसेवकांची हकालपट्टी केली आहे (AIMIM take action against absent corporator).

पक्षविरोधी काम भोवलं, एमआयएमकडून 6 नगरसेवकांची हकालपट्टी
Follow us on

औरंगाबाद : पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी 6 नगरसेवकांची हकालपट्टी केली आहे (AIMIM take action against absent corporator). संबंधित एमआयएम नगरसेवकांनी उपमहापौर निवडणुकीत गैरहजेर राहून विरोधी पक्षांना मदत केल्याचा आरोप आहे. त्यामुळे नगरसेवकांना त्यांची गैरहजेरी चांगलीच भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

औरंगाबादच्या उपमहापौरपदासाठी आज बरिच चुरस पाहायला मिळाली. औरंगाबादमध्ये एमआयएमचे एकूण 25 नगरसेवक आहे. शिवसेना 29, भाजप 22, काँग्रेस 08, राष्ट्रवादी 04 आणि इतर 24 नगरसेवक आहेत. त्यामुळे उपमहापौरपद कुणाकडे जाणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यात औरंगाबादमध्ये महाविकासआघाडीचा प्रयोग होत असल्यानं हा प्रयोग यशस्वी होणार की अपयशी याकडेही अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांची उपमहापौरपदी निवड झाली. राजेंद्र जंजाळ यांना 51 मतं पडली, तर भाजप पुरस्कृत उमेदवाराला 32 मतं मिळाली.

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी आज (मंगळवार, 31 डिसेंबर) निवडणूक झाली. महाविकास आघाडीत उपमहापौरपद काँग्रेसला मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र शिवसेनेने राजेंद्र जंजाळ यांना उमेदवारी दिली.

उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे जंजाळ, काँग्रेसचे अफसर खान, भाजप पुरस्कृत गोकुळ मलके, एमआयएमकडून जफर बिल्डर असे उमेदवार होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राजेंद्र जंजाळ यांना मतदान केलं. काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फुटल्यामुळे शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांना 51 मतं मिळाली. भाजप पुरस्कृत मलके यांना 34, तर एमआयएमच्या जफर बिल्डर यांना 13 मतं मिळाली. संख्याबळ 25 असतानाही केवळ 13 मतं पडल्याने एमआयएमची चांगलीच नाचक्की झाली. त्यामुळेच जलील यांनी गैरहजर नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली.

औरंगाबाद महापालिकेत युतीचा काडीमोड, भाजपच्या उपमहापौराचा राजीनामा

औरंगाबाद उपमहापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएममध्ये फूट पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र जंजाळ यांना एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी मतदान केल्याचं म्हटलं जातं. तर एका नगरसेवकाने भाजप पुरस्कृत उमेदवार गोकुळ मलके यांना मत दिल्याचीही चर्चा आहे.

काँग्रेसचे 3 नगरसेवक गैरहजर राहिले होते. तर उपस्थित असलेल्यां एका नगरसेवकाने भाजप उमेदवाराला मतदान केलं. राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक उपस्थित होते तर 2 गैरहजर होते. मात्र दोघांनीही शिवसेनेच्या पारड्यात मत टाकलं.

युतीचा काडीमोड

औरंगाबादचे माजी उपमहापौर विजय औताडे यांनी 13 डिसेंबरला राजीनाम्याची घोषणा करत खळबळ उडवून दिली होती. औरंगाबाद महापालिका निवडणुकीला अवघे चार महिने बाकी असताना भाजपने हा पवित्रा घेतला होता.