अजित पवार यांचा गौप्यस्फोट, ‘मल्लिकार्जुन खर्गे शरद पवारांवर चिडले, आणि…’
"नेहरु सेंटरला चर्चा व्हायची. एकदा काय झालं, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे शरद पवारांना काहीतरी बोलले आणि चिडाचिड झाली. शरद पवार उठले आणि तिथून वरच्या मजल्यावरुन खाली चालले. प्रफुल्ल पटेल आणि मला बोलावलं, हे काही म्हणतील तसं ऐकत नाही. विधानसभा अध्यक्षांवरुन मतभेद झाले आणि काहीतरी जागांवरुन मतभेद झाले", असा खुलासा अजित पवारांनी केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात आज अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून 2017 आणि 2019 मध्ये वारंवार भाजपसोबत जाण्याचे प्रयत्न करण्यात आले. शरद पवार हे भाजपसोबत जाण्यास तयार होते. पण त्यांना शिवसेना नको होती. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपली शिवसेनेसोबत अनेक वर्षांपासूनची युती आहे. त्यामुळे शिवसेनेला सोडू शकत नाही, असं सांगितलं होतं. त्यामुळे बोलणी फिस्टकटली होती, असा दावा अजित पवार यांनी केला. विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीवेळी शरद पवार यांची भाजप सोबतही बोलणं सुरु होतं. भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत एका उद्योगपतीच्या घरी बैठका झाल्या होत्या. या बैठकीला आपण स्वत: उपस्थित होतो, असा खुलासा अजित पवारांनी केला.
“नेहरु सेंटरला चर्चा व्हायची. एकदा काय झालं, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे शरद पवारांना काहीतरी बोलले आणि चिडाचिड झाली. शरद पवार उठले आणि तिथून वरच्या मजल्यावरुन खाली चालले. प्रफुल्ल पटेल आणि मला बोलावलं, हे काही म्हणतील तसं ऐकत नाही. विधानसभा अध्यक्षांवरुन मतभेद झाले आणि काहीतरी जागांवरुन मतभेद झाले. ते म्हणाले की, यांना काही सरकार करायचं नाही. आपलं ठरलंय तसं करुन टाका. बरं म्हटलं करुन टाकतो. शरद पवार निघून गेले. प्रफुल्ल पटेल यांना म्हटलं आता काय करायचं? ते म्हणाले काय करायचं ते करा”, असा खुलासा अजित पवार यांनी केला.
जयंत पाटील म्हणाले, ‘दादा तुम्ही वर्षावर जा, पण…’
“जयंत पाटील यांना बोललो. ते म्हणाले, दादा तुम्ही वर्षावर जा. पण दाराची फट उघडी ठेवा. कोण? करेक्ट कार्यक्रम करणारे जयंत पाटील. मी म्हटलं, साहेब आपण प्रांताध्यक्ष. जशी आज्ञा. चर्चेला गेलो. रात्रीची वेळ. त्यांनी तिकडून दिल्लीला फोन केला. त्यांनी सांगितलं की, उद्या सकाळी तुमची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो. आपण त्या पद्धतीने गोष्टी केल्या. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी रात्री दीड वाजता कॅबिनेट बैठक झाली. सकाळी आठ वाजता शपथविधी झाला. पण आता पहाटे म्हणतात. पुन्हा काय राजकारण झालं ते सर्वांना माहिती आहे. 1978 मध्ये अशाच पद्धतीने दादा पाटील यांचं सरकार पाडलं. पुन्हा सरकार बनवलं. गेली 50 वर्षे ते सांगतील ते ऐकलं”, असा दावा अजित पवारांनी केला.