‘वंदे मातरम’ला विरोध नाही, पण महागाई, शेतकरी प्रश्नावर का बोलत नाहीत? अजितदादांचा मुनगंटीवारांना खोचक सवाल

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढलेल्या वंदे मातरम् संदर्भातील शासन आदेशावरुनही अजित पवार यांनी खोचक सवाल केलेत.

वंदे मातरमला विरोध नाही, पण महागाई, शेतकरी प्रश्नावर का बोलत नाहीत? अजितदादांचा मुनगंटीवारांना खोचक सवाल
अजित पवार, सुधीर मुनगंटीवार
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 16, 2022 | 5:20 PM

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यानंतर पहिलंच पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) होत आहे. विरोधकांची आक्रमकता पाहता हे अधिवेशन अधिक गाजण्याची शक्यता आहे. सरकारनं बोलावलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय. तशी माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढलेल्या वंदे मातरम् संदर्भातील शासन आदेशावरुनही अजित पवार यांनी खोचक सवाल केलेत.

‘वंदे मातरम’ला विरोध नाही, पण…

अजित पवार म्हणाले की, जे महत्वाचे विषय आहेत त्यावर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणले जात आहेत आणि त्यावर चर्चा घडवल्या जात आहेत. आपण जय महाराष्ट्र म्हणतो, जय हिंद बोलतो, जय हरी बोलतो. आता वंदे मातरम् मध्येच काय काढलंय? त्याला विरोध नाही. पण तुम्ही महागाईवर बोलत नाही. इंधन दरवाढीवर बोलत नाही. जीएसटी वाढीवर बोलत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावलाय.

शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार अनुदान द्या

इतकंच नाही तर अतिवृष्टी आणि शेतकरी मदतीवरुनही अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरलं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, आम्ही एनडीआरएफच्या नियमांच्या दुप्पट मदत करु. पण एनडीआरएफचे निकषच कालबाह्य झाले आहेत. दुप्पट मदत जाहीर करुन शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही. आम्ही सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांना तिप्पट मदत जाहीर केली होती. साधारण 15 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. अजूनही अतिवृष्टी सुरु असल्यानं त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही अजित पवार यांनी व्यक्त केलीय. सरकार कुणाचंही असलं तरी गरीब माणूस, शेतकरी अडचणीत असल्यावर त्याला पुन्हा उभं करण्यासाठी जी मदत द्यायला हवी ती होताना दिसत नाही. पीक कर्ज वाटपाचं टार्गेट ठेवलं त्याच्या निम्म्यानंही पीक कर्ज वाटप झालेलं नसल्याचं अजितदादा म्हणाले.