‘त्या’ पराभवाची सल, रमेश थोरात गाफील राहिले आणि घात झाला : अजित पवार

| Updated on: Nov 18, 2019 | 11:34 AM

पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जवळपास सर्वच जागा आघाडीने जिंकल्या. याला अपवाद मात्र दौंड मतदारसंघ (Ajit Pawar on Daund Vidhan sabha result) ठरला. अवघ्या 673 मतांनी भाजप उमेदवार राहुल कुल यांनी ही अटीतटीची लढत जिंकली.

त्या पराभवाची सल, रमेश थोरात गाफील राहिले आणि घात झाला : अजित पवार
Follow us on

पुणे : पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जवळपास सर्वच जागा आघाडीने जिंकल्या. याला अपवाद मात्र दौंड मतदारसंघ (Ajit Pawar on Daund Vidhan sabha result) ठरला. अवघ्या 673 मतांनी भाजप उमेदवार राहुल कुल यांनी ही अटीतटीची लढत जिंकली. दौंडमध्ये (Ajit Pawar on Daund Vidhan sabha result) अवघ्या काही मतांनी झालेल्या पराभवाची सल आजही राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांच्या मनात आहे. त्यामुळेच त्यांनी बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ही सल बोलून दाखवली. इतकंच नाही तर त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांच्या गावातच विरोधी उमेदवाराला मताधिक्य मिळाल्यानं अजित पवार यांनी चांगलाच दम भरला.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते काल झाला. विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर पहिल्यांदाच अजित पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी जिल्ह्यात महाआघाडीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल मतदारांचे आभार मानले, त्याचवेळी त्यांनी विजयी उमेदवारांचंही कौतुक केलं.

“दौंडमध्ये आपण रमेश थोरात यांना सभा घेण्याबद्दल बोललो होतो. मात्र शरद पवार यांची विराट सभा झाल्यामुळे माझ्या सभेला त्यांनी नकार दिला. साहजिकच त्यावेळी चांगलं वातावरण निर्माण झालंय हे पाहून रमेश थोरात गाफील राहिले आणि घात झाला” अशा शब्दात अजित पवारांनी दौंडमधील पराभवाची सल बोलून दाखवली.

इतकंच नव्हे तर दौंडमधील अनेक पदाधिकाऱ्यांच्या गावात विरोधी उमेदवाराला मिळालेल्या मताधिक्याकडे लक्ष वेधत त्यांनी आता आपण दौंडमध्ये गेल्यावरच काय ते बोलू अशा शब्दात संबंधित पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.

विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील उमेदवारांची जबाबदारी घेतली होती. आपल्याकडील जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून विरोधकांचा पाडाव करण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष घातलं होतं. असं असताना दौंडमध्ये शरद पवार यांच्या विराट सभेनंतर वातावरण बदललं असं चित्र निर्माण झालं होतं. त्यामुळंच राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात हे नंतरच्या काळात गाफील राहिले. त्याचाच फटका त्यांना या निवडणुकीत बसल्याचं राजकीय विश्लेषक ज्ञानेश्वर जगताप सांगतात.

राज्यात महाआघाडीचा सूफडासाफ होईल की काय अशी शंका असतानाच विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळालं. मात्र काही ठिकाणी थोड्याफार फरकानं आघाडीचे उमेदवार पराभूत झालेत. त्यामुळंच अजित पवार यांनी दौंडच्या लढतींबद्दल आपलं मत व्यक्त करत पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.