अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार न स्वीकारताच मंत्रालयातून परतले

| Updated on: Nov 25, 2019 | 3:35 PM

मंत्रालयात गेलेले अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार न स्वीकारताच चर्चगेटमधील घरी परतले.

अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार न स्वीकारताच मंत्रालयातून परतले
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाच नसल्याचं समोर आलं आहे. मंत्रालयात गेलेले अजित पवार कार्यभार न स्वीकारताच चर्चगेटमधील घरी (Ajit Pawar Returns without taking charge) परतले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी मनधरणीचे केलेले प्रयत्न यशस्वी ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.

अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत शनिवारी (23 नोव्हेंबर 2019) भल्या सकाळी उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घेतला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी अजित पवारांच्या मनधरणीचे अतोनात प्रयत्न केले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे यांनी आजही तीन-चार तास चर्चा केली. या मनधरणीचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, असं राष्ट्रवादीतील 30 ते 35 अस्वस्थ आमदारांचं म्हणणं असल्याचं छगन भुजबळांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे मोठं नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचं मन वळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत आहेत.

जयंत पाटील यांनी महाआघाडीच्या नेत्यांसह राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. 160 आमदारांचा पाठिंबा देणारं सह्यांचं पत्र देखील राजभवनातील सचिवांकडे देण्यात आलं आहे.

सुप्रीम कोर्टात काय झालं?

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीने भाजपच्या सत्तास्थापनेला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयाचे दारं ठोठावली आहेत .(MahaVikas Aaghadi in Supreme Court). महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Government formation) महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली. देवेंद्र फडणवीस सरकारच्या बाजूने आणि विरोधात असे जवळपास दीडतास युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने विश्वासदर्शक ठरावाचा निर्णय मंगळवारी 10.30 पर्यंत राखीव ठेवला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी पदभार स्वीकारला, पहिली स्वाक्षरी कशावर?

विश्वासदर्शक ठराव तातडीने होणार की नाही याचा  निर्णय उद्या होणार आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेतर्फे कपिल सिब्बल, काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे अभिषेक मनू सिंघवी, अजित पवार यांच्यातर्फे मणिंदर सिंग, भाजपतर्फे मुकुल रोहतगी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात आपआपली बाजू मांडली.

सकाळी दहा वाजून 35 मिनिटांनी कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झाली. वकील तुषार मेहता यांनी कोर्टाच्या मागणीप्रमाणे आज ज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी दिलेल्या निमंत्रणाचे पत्र आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेसाठी संख्याबळ असल्याचा दावा करणारे पत्र सादर केलं. त्यानंतर  ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आक्रमकपणे भाजपची बाजू मांडली.

Ajit Pawar Returns without taking charge