शरद पवारांनी जे 1978 मध्ये केलं, तेच अजित पवारांनी आज केलं?

| Updated on: Nov 23, 2019 | 7:34 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारची सकाळ (23 नोव्हेंबर) भूकंप घडवत उजाडली. शनिवारी सकाळी राज्यातील राजकारणात मोठे बदल पाहायला मिळाले.

शरद पवारांनी जे 1978 मध्ये केलं, तेच अजित पवारांनी आज केलं?
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारची सकाळ (23 नोव्हेंबर) भूकंप घडवत उजाडली. शनिवारी सकाळी राज्यातील राजकारणात मोठे बदल पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit pawar use sharad pawar formula) यांनी आपल्या पक्षाला मोठा झटका दिला. अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा ताज फडणवीसांना घातला आणि स्वत: उपमुख्यमंत्री (Ajit pawar use sharad pawar formula) बनले आहेत.

पक्ष सोडून सत्ता मिळवण्याची ही घटना पवार कुटुंबात नवीन नाही. यापूर्वीही ठिक 41 वर्षापूर्वी 1978 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी त्यांनी अजित पवारांसारखी राजकीय खेळी केली होती. त्यावेळी शरद पवारांनी पक्ष फोडून थेट मुख्यमंत्रिपद मिळवले होते. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला होता.

1977 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा जनता पक्षाकडून पराभव झाला होता. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी या पराभवाची जबाबदारी स्विकारत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याऐवजी वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्यात आले. त्यानंतर काँग्रेसमध्ये दोन गट पडले आणि दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडली.

या निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून जनता पक्ष ठरला होता. पण त्यांच्याकडे बहुमत नव्हते. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या दोन गटांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये शरद पवार उद्योग आणि कामगार मंत्री होते.

शरद पवार यांनी जुलै 1978 मध्ये आपला पक्ष सोडला. या दरम्यान त्यांनी काही आमदारही फोडले. यानंतर त्यांना जनता पक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबाही दिला. जनता पक्षाच्या पाठिंब्याने शरद पवार पहिल्यांदाचा 1978 मध्ये 38 वर्षाच्या वयात मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणही पक्षात परतले होते.

दरम्यान, इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यानंतर फेब्रुवारी 1980 मध्ये पवारांच्या नेतृत्वातले पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार पडले. त्यानंतर पुढील निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. काँग्रेसकडून अब्दुल रहमान अंतुले यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले.