अजितदादांनी तोच शब्द वापरला, जो आबांनी वापरला होता!

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई: राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आज पुन्हा एकदा मराठा, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गदारोळ पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मराठा आणि धनगर आरक्षणाचा अहवाल सभागृहात मांडा अन्यथा सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका घेतली. मागासवर्ग आयोगावरुन राज्याचे मंत्री वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम होत आहे, त्यामुळे मराठा आरक्षणाचा अहवाल सभागृहात मांडा असं […]

अजितदादांनी तोच शब्द वापरला, जो आबांनी वापरला होता!
Follow us on

मुंबई: राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आज पुन्हा एकदा मराठा, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गदारोळ पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मराठा आणि धनगर आरक्षणाचा अहवाल सभागृहात मांडा अन्यथा सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका घेतली. मागासवर्ग आयोगावरुन राज्याचे मंत्री वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम होत आहे, त्यामुळे मराठा आरक्षणाचा अहवाल सभागृहात मांडा असं अजित पवार म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनी माहित्या हा शब्द वापरला. हा शब्द यापूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे स्वर्गीय नेते आर आर पाटील यांनी अनेकवेळा वापरला होता. खेडेगावात माहित्या असा शब्द वापरला जातो. मात्र आर आर पाटील यांनी गृहमंत्री असताना, “तपास सुरु आहे आणि माहित्या घेऊन सांगतो”, असं अनेकदा म्हटलं होतं.  आबांच्या या ‘माहित्या’ शब्दावरुन त्यांना एकप्रकारे ट्रोल केलं होतं. माहित्या असा शब्द नसतो तर माहिती हाच शब्द असतो, असं अनेकांनी त्यावेळी म्हटलं होतं.

मात्र दुसरीकडे आबांच्या भाषेपेक्षा त्यांच्या ज्ञानाकडे पाहा, गावाकडच्या माणसाची भाषा मुंबई-पुण्याच्या लोकांना रुचणार नाही, असं प्रत्युत्तर आबांच्या समर्थकांनी विरोधकांना दिलं होतं.

आर आर आबा हे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेलं व्यक्तीमत्त्व होतं. फेब्रुवारी 2015 मध्ये वयाच्या 57 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

 अजित पवार आज सभागृहात नेमकं काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले, आम्ही  प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याची विनंती केली.  मराठा समाजात संभ्रमावस्था आहे. मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांनी मागासवर्ग आयोगाच्या अहवालाबाबत वेगवेगळी स्टेटमेंट दिली. काल मुंबई उच्च न्यायालयात सरकारच्यावतीने अॅडव्होकेट जनरलनी आम्ही अहवाल स्वीकारला असं सांगितलं. त्यावर हायकोर्टाने आपलं मत व्यक्त केलं. त्यानंतर मागच्या वेळचे अॅडव्होकेट जनरल आणि आताचे निष्णात वकील रवी कदम यांनी सरकारतर्फे सांगितलं की आम्ही अहवाल नाही तर शिफारसी स्वीकारल्या. त्यामुळे सरकारच्या या वक्तव्यांमुळे संभ्रम होत आहे. 52 टक्क्यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं. पहिला आठवडा संपत आला तरी मागास आयोगाचा अहवाल ठेवला नाही. बाहेर मात्र आम्हाला माहित्या मिळत आहेत. बाहेर अहवाल उपलब्ध आहे.

त्या आयोगाचे सदस्य वेगवेगळे मत व्यक्त करत आहेत. चॅनेलवर मांडत आहेत.  मुख्यमंत्रीही म्हणाले आम्ही शिफारसी स्वीकारल्या. आम्ही पण 15 वर्षे कारभार केला आहे. तो अहवाल काय आहे, तो सभागृहात ठेवावा लागतो. मात्र आताचं सरकार तो अहवाल ठेवत नाही. टिसचा अहवालही ठेवला नाही. धनगर आरक्षणाबाबत गुप्तता आहे. आमचं म्हणणं आहे की आठवडा संपत आला तरी मराठा आरक्षणाबाबत संभ्रमावस्था का?  , मागासवर्ग आयोगाचा अहवाल अजून पटलावर का नाही? इतकी गुप्तता का? सरकारने संभ्रम दूर करावा”, असं अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणतात की जल्लोष करा, पण कशाच्या जोरावर करायचा? काय ते स्पष्ट सांगावं, सरकारने चित्र स्पष्ट करावं, असं अजित पवारांनी नमूद केलं.

चंद्रकांतदादा पांडुरंगाला साकडं घालतात मराठा आरक्षण टिकावं, त्यापूर्वी मुख्यमंत्री म्हणतात जल्लोष करा, अन्य मंत्र्यांची वेगवेगळी वक्तव्यं येतात, सरकार संभ्रम निर्माण करतंय, असा आरोप अजित पवार यांनी केला.